शीतगृहे उभारण्यासाठी शासन प्रयत्नशील - सदाभाऊ खोत

कोल्हापूर - ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजित किसान महोत्सवाचे उद्‌घाटन दीपप्रज्वलनाने करताना कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत. शेजारी सुनंदा बहेनजी, राजू भाई, डॉ. राम खर्चे, डॉ. पांडुरंग वाठारकर आदी.
कोल्हापूर - ब्रह्माकुमारी संस्थेतर्फे आयोजित किसान महोत्सवाचे उद्‌घाटन दीपप्रज्वलनाने करताना कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत. शेजारी सुनंदा बहेनजी, राजू भाई, डॉ. राम खर्चे, डॉ. पांडुरंग वाठारकर आदी.

कोल्हापूर - ‘शेताच्या खळ्यावरील धान्य हे थेट व्यापाऱ्याकडे न जाता ते शेतकऱ्याच्या घरी जायला पाहिजे. धान्याच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन शीतगृहे उभारण्यासाठी प्रयत्नशील आहे,’’ असे मत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. ब्रह्माकुमारी संस्थेच्या कृषी व ग्रामविकास प्रभागातर्फे आयोजित दोनदिवसीय किसान महोत्सवाच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ब्रह्माकुमारी ग्रामविकास प्रभागाच्या राष्ट्रीय संयोजिका सुनंदा बहेनजी होत्या. शिवाजी पेठेतील ब्रह्माकुमारी संस्थेच्या राजयोग सभागृहात कार्यक्रम झाले. 

श्री. खोत पुढे म्हणाले, ‘‘ चांगला दर मिळाल्यानंतरच धान्याची विक्री व्हायला हवी. यावर्षी तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. लाखो क्विंटल तूर खरेदी केली आहे. पंचनामे झालेली तूर खरेदी करण्याचे काम चालूच आहे. शेतीमालाचे कमी उत्पादन झाले तर, उत्पादन जास्त होऊनही योग्य हमीभाव मिळाला नाही तर, अशा दोन कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करतात. या दृष्टचक्रातून शेतकऱ्यांना बाहेर काढायला हवे. ब्रह्माकुमारी संस्थेने शाश्‍वत योगिक शेती यशस्वी करून शेतकऱ्यांना जगण्याचे बळ दिले आहे. ’’ ब्रह्माकुमारी ग्रामविकास प्रभागाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजू भाई, डॉ. शंकरराव राऊत, डॉ. राम खर्चे, डॉ. पांडुरंग वाठारकर, दशरथ भागवत यांनीही मार्गदर्शन केले. पी. एम. पाटील, प्राचार्य गजानन खोत, शोभा बहेनजी, बसवराज आजरे, गोपाल झंवर, प्रा. दिनेश डांगे, रंगराव भाई, रघुनाथ भाई उपस्थित होते. सुनंदा बहेनजी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन वसंतराव चौगले यांनी केले. सुनीता बहेनजी यांनी आभार मानले.

खळं गेलं आणि मालकीणपणही संपलं 
पूर्वीच्या उत्तम शेतीच्या काळात पुरुष शेतीचा मालक असायचा, तर खळ्याची मालकीण शेतकऱ्याची बायको असायची. घरातील धान्य गरजेनुसार मालकीण विकायची. आता शेतातूनच धान्य व्यापारी घेऊन जात असल्याने शेतकऱ्यांचं खळंही गेलं अन्‌ त्याच्या बायकोचं मालकीणपणही संपलं, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com