सोलापूर - योगी-महंतांनी त्याग करून, सन्यास घेऊन समाजसेवा करणे अपेक्षित आहे. मात्र त्यांना राजकारणात सर्वोच्च स्थान देऊन भाजपच हिंदुत्वाचा अवमान करीत आहे, अशी टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी शनिवारी केली.
"कॉफी विथ् सकाळ' उपक्रमात त्या आज "सकाळ' कार्यालयात बोलत होत्या. सहयोगी संपादक अभय दिवाणजी यांनी त्यांचे स्वागत केले. आमदार शिंदे म्हणाल्या, 'योगी आणि महंतांनी राजकारणा येणे अपेक्षित नाही. त्यांनी "त्याग' केला पाहिजे. समाजाची सेवा केली पाहिजे. आपल्या देशात योगी व महंतांबद्दल जनमाणसांत वेगळी प्रतिमा आहे, आदरभाव आहे. मात्र सध्या उलटे सुरू आहे. हिंदुत्व बिंबविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या भाजपकडून योगी आणि महंतांनाच सत्तेत आणले जात आहे. त्या दृष्टिकोनातूनच तेथील सरकारचे निर्णय घेतले जात आहेत.''
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजूनही विरोधी पक्षात असल्यासारखे आक्रमक आहेत, असे सांगून आमदार शिंदे म्हणाल्या, 'तुमचा "बायोडाटा' माझ्या हातात आहे, असे म्हणत सभागृहात धमकावणे योग्य नाही. प्रत्येक बाबतीत आक्रमकपणे उत्तरे देण्याच्या त्यांच्या भूमिकेचे कोणीही समर्थन करणार नाही.'' भाजपप्रमाणेच "एमआयएम'ची एक विचारधारा आहे. त्यामुळे जोपर्यंत भाजप आहे, तोपर्यंत "एमआयएम'चे अस्तित्व कायम असेल, असेही त्या एका प्रश्नाचे उत्तर देताना म्हणाल्या.
एकीकडे कौशल्य विकासचा नारा द्यायचा, विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षण मिळाले पाहिजे असा हट्ट करायचा आणि दुसरीकडे चांगल्या स्थितीत सुरू असलेले तंत्रशिक्षण महाविद्यालये बंद करायची ही दुटप्पी भूमिका सध्या राज्य सरकार अवलंबित आहेत.
- प्रणिती शिंदे, आमदार, कॉंग्रेस
|