हिंगोली: कळमनुरी तालुक्यातील सालापूर येथील शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून मंगळवारी (ता.4) आत्महत्या करणार असल्याचे कळवले आहे. या प्रकाराने प्रशासनाने एकच धावपळ चालवली आहे.
कळमनुरी तालुक्यातील सालापूर येथील शेतकरी रामचंद्र किशनराव पुंड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. आपल्याकडे 91 आर जमीन असून पत्नीच्या नावाने 65 आर जमीन आहे. याशिवाय सत्तर आर जमीन त्यांच्या सुनेच्या नावाने आहे.
दरवर्षी हळद, ऊस, कापूस, केळी व काही भाजीपाल्याचे पिके ते घेत होते. ऊस लागवड देखील केली आहे. तसेच पाणीपाळ्या देखील लावून बागायती शेती केली आहे. दरवर्षी नियमितपणाने ते पाणीपट्टी भरतात, तरी पण तलाठी सज्जा दांडेगाव यांनी शेताची पाहणी न करता ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले त्यांची नावे बागायती व कापसाच्या शासकीय मदतीच्या यादीत टाकली. तेव्हा श्री. पुंड यांनी तलाठ्याकडे विचारणा केली असता त्यांनी पुरवणी यादीत नाव टाकल्याचे सांगितले. त्यानंतर कळमनुरी तहसीलमध्ये पुरवणी यादी दाखल झाली. नंतर तलाठी भेटला नाही.
त्यानंतर पुन्हा विचारणा केली असता कागदावर वजन ठेवल्याशिवाय काम होत नाही. कापसाचे व बागायतीचे पैसे द्या, त्यानंतर काम होईल असे सांगितले. तेव्हा श्री. पुंड यांनी त्यांच्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यांच्याकडे पूर्ण बागायती ऊस हळद व कापूस याच्या पावत्या असूनही त्यांच्यावर नुकसानीची मदत न देण्याचा अन्याय झाला. अशा परिस्थितीत न्याय न मिळाल्यास त्यांनी मंगळवारी (ता.4) डोंगरकडा मध्यवर्ती सहकारी बँकेसमोर गळफास लावून घेवू किंवा विहिरीत उडी मारून जीव देवू असे या पत्रात म्हटले आहे. तसेच आपण मेल्यास आपला अंत्यविधी तहसीलदार आल्याशिवाय करू नका असे या पत्रात म्हटले आहे. या पत्रामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित शेतकऱ्याकडे विचारणा केली जात आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.