विचार बदलले की कृती बदलेल - पंचागकर्ते मोहन दाते

solapur
solapur

सोलापूर : स्मार्ट सिटीच्या दिशेने जाणाऱ्या सोलापुरातील संभाजी तलाव पूर्णपणे प्रदूषणमुक्त करून पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यात यावे. उदासीन असलेल्या महापालिका प्रशासन आणि शासनाने याकडे लक्ष द्यावे यासाठी नागरिकांनी एकत्र येऊन दबावतंत्राचा वापर करावा. प्रशासन आपल्यापरीने बदल करेलच, पण नागरिकांनीही आता स्मार्ट होण्याची गरज आहे. विचार बदलेले की कृती बदलेल, असे मत पंचागकर्ते मोहन दाते यांनी व्यक्त केले. 

प्रदूषणमुक्त संभाजी तलाव अभियान अंतर्गत सोमवारी "सकाळ' कार्यालयात मान्यवरांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत ज्ञानप्रबोधिनी पौरोहित्य विभागाच्या डॉ. अपर्णा कल्याणी, सुनेत्रा पंडित, सामाजिक कार्यकर्त्या विद्या मणुरे, लता शिवशरण, सामाजिक कार्यकर्ते बसवराज परांडकर, भाऊराव भोसले, ओंकारनाथ गाये, अनिल जोशी आदी उपस्थित होते. या वेळी संभाजी तलाव प्रदूषणमुक्त करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली.

महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णयही घेण्यात आला. 
दाते म्हणाले, "गणेश विसर्जन करण्यासाठी सिद्धेश्‍वर तलाव, संभाजी तलावासह अन्य तलावांच्या ठिकाणी स्वतंत्र पाऊंड करण्यात यावेत, ही संकल्पना 1996 मधे दाते पंचांगात आम्ही मांडली. महापालिकेने ही संकल्पना स्वीकारून तलावांच्या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जनासाठी स्वतंत्र हौद केले. याप्रमाणेच आता विसर्जनाच्या ठिकाणी निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र कलश उभारण्यात यावेत. याकरिता महापालिका प्रशासनासह रोटरी, लायन्स क्‍लब आणि बॅंकांनी पुढाकार घ्यावा.'' 

"संभाजी तलाव परिसरातील प्रदूषणात निर्माल्यामुळे होणारे प्रदूषण 5 ते 10 टक्के असेल. धोबी घाट आणि ड्रेनेजच्या पाण्यामुळे होणारे प्रदूषण पूर्णपणे थांबविण्यात यावे. लोकांचे विचार बदलणे गरजेचे आहे. सोलापूर शहर स्वच्छ आणि सुंदर व्हावे यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. घरात, मंदिरात जमा होणारे निर्माल्य थेट जलाशयांतच आणून टाकले जाते. यावर उपाय म्हणून शहरातील गर्दी होणाऱ्या मंदिरांच्या परिसरात निर्माल्य कलश ठेवण्यात यावेत. निर्माल्याचे पावित्र्य राखायला हवे. निर्माल्य कलश सातत्याने रिकामे करण्यात यावेत. संभाजी तलावात लोकांकडून कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होऊ नये यासाठी महिलांच्या माध्यमातून प्रबोधनाची मोहीम हाती घेण्यात यावी. शाळा, महाविद्यालयांतही कार्यक्रम आयोजित करावेत,'' असे दाते यांनी सांगितले. 

तलावाच्या परिसरात देवांच्या प्रतिमाही आणून ठेवल्या जातात. मध्यंतरी काही तरुणांनी देवाच्या प्रतिमा एकत्र करून काचेच्या फ्रेममधून कागदी प्रतिमा बाहेर काढून त्या अग्नीला अर्पण केल्या होत्या, अशीही आठवण श्री. दाते यांनी सांगितली. 

स्वच्छता ठेवणे हे नागरिकांचे कर्तव्य आहे. स्वच्छता करणे हे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. यांचा समन्वयक करून सोलापूर स्मार्ट करायला हवे. महापालिका प्रशासन आणि नागरिकांनी आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवली तरच संभाजी तलावासह शहरातील बागा, सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ राहतील. आवश्‍यकता वाटल्यास "सकाळ'च्या माध्यमातून नागरिकांनी महापालिका प्रशासन आणि शासनावर दबावतंत्राचा वापर करायला हवा. 
- मोहन दाते, पंचागकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com