सोलापूर - कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागण्या राज्य सरकारने नाकारत एकतर्फी वेतनवाढ जाहीर केली. त्याच्या निषेधार्थ राज्य परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला असून दररोजच्या सुमारे 65 हजार फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत असून महामंडळाला दररोज कोट्यवधींचे नुकसान होत आहे.
परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी वेतनवाढीची घोषणा करण्यापूर्वी "सकाळ'मधून कर्मचारी संपाच्या तयारीत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तरीही त्याकडे दुर्लक्ष करत सरकारने कर्मचाऱ्यांना विश्वासात न घेताच निर्णय जाहीर केला. आता कर्मचाऱ्यांच्या हक्काची आरपारची लढाई असून तोडगा निघेपर्यंत माघार नाही, अशी भूमिका कामगार संघटनांकडून घेण्यात आली आहे. सोलापूर, उस्मानाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिकसह अन्य जिल्ह्यांमध्ये आता संपाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांची चिंता वाढली असून कर्मचाऱ्यांचा संप मिटविण्यासाठी सरकारने तत्काळ तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार जोपर्यंत सकारात्मक तोडगा काढत नाही तोवर हा संप सुरूच राहील. कर्मचारी संघटनांच्या मागण्या अमान्य करत सरकारद्वारे एकतर्फी निर्णय जाहीर केला. सकारात्मक तोडगा निघेपर्यंत आता कोणत्याही स्थितीत माघार नाही, असे महाराष्ट्र स्टेट ट्रान्स्पोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.