सोलापूर - संवादातून देशांतर्गत दहशतवादाचा बीमोड शक्य आहे, मात्र विद्यमान सरकार हिदुत्वाच्या मागे लागले आहे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.
पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतीदिनानिमित्त उद्या (रविवारी) होणाऱ्या दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे "सकाळ'शी बोलत होते. शिंदे म्हणाले, 'संवादातून दहशतवादाच्या प्रश्नावर मार्ग निघू शकतो. मात्र विद्यमान सरकार हे हिंदुत्वाच्या मागे लागले आहे. तोच त्यांचा अजेंडा आहे. त्यामुळे संवादाचा मार्ग त्यांना शक्य नाही. मेमनला फाशी दिल्यानंतर हजारो लोक अंत्यसंस्कारासाठी जमले होते. अशा घटनांमुळे दोन समाजामध्ये एकोपा निर्माण होण्याऐवजी तेढ, द्वेषच निर्माण होतो. हा देश सर्वधर्म समभावाच्या मूल्यावर वाटचाल करणारा आहे. देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली''
'विद्यमान सरकारला दहशतवाद, नक्षलवादाला नियंत्रित करणे शक्य झाले नाही. दहशतवादावरील नियंत्रण हाताबाहेर गेले आहे. रोजचे वर्तमानपत्र उघडले, की रोज आपले जवान मारले जात असल्याचे वाचण्यात येते. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या कालावधीत असे होत नव्हते,'' असे शिंदे यांनी नमूद केले.
|