सातारा - देशातील लहानसहान समाजांना आघाडी सरकारने गेली 60 वर्षे संरक्षण दिले होते. ते मोडून काढण्याची भाजपची मानसिकता आहे.
या देशात पुन्हा मनुवाद आणण्याचा प्रयत्न भाजप करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. शहरी मतदारांना फसविल्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या जागा 60 ते 70 पर्यंत घसरू शकतात, असे भाकितही त्यांनी वर्तविले.
श्री. पाटील यांनी आज साताऱ्यातील बुथ स्तरावरील बांधणीचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, 'भाजपने धनगर समाजाला दिलेले आरक्षणाचे आश्वासन पूर्ण केलेले नाही. लिंगायत समाजाकडेही दुर्लक्ष केले. त्यापुढे संविधान जाळण्याचे पाप दिल्लीत होत असून, त्याबाबत कोणालाही अटक होत नाही. संविधान जाळून आरक्षणाच्या विरोधी भूमिका सांगणारे लोक दिल्लीत दोन-दोन तास कार्यक्रम करत असतात. ही मनुवादी मानसिकता पुन्हा एकदा देशासमोर आली आहे. आम्ही घटना बदलण्यासाठीच सत्तेवर आलोय, असे केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंनी केलेले विधान याला मिळतेजुळते आहे. देशातील लहानसहान समाजाला आघाडी सरकारच्या साठ वर्षांच्या काळात संरक्षण दिले होते. ते मोडून काढण्याची भाजपची मानसिकता आता सर्वांच्या लक्षात आली आहे.''
गेल्या तीन-चार वर्षांत विजेचे दर तिसऱ्यांदा वाढविले आहेत. शेतीमालाच्या दराचा पत्ता नाही. हे सरकार शहरी नागरिकांना, बेरोजगारांना न्याय देऊ शकलेले नाही. मोदींच्या खोट्या आश्वासनांवर शहरी मतदारांचे मन वळविण्यात भाजप यशस्वी झाले होते. तोच मतदार आता त्यांच्यापासून दूर गेल्याचे दिसते. एखाद्या महापालिकेतील यशामुळे सर्व चित्र बदलेल असे होत नाही.
त्यांची महाराष्ट्रातील ताकद 50 ते 60 आमदारांचीच राहिली आहे,'' असेही त्यांनी नमूद केले.
इतर कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
खासदारकीचा निर्णय सहमतीनेच...
उदयनराजे भोसले आमच्या पक्षाचे खासदार आहेत. त्यांचे सातारा मतदारसंघात काम आहे. येथील पक्षाचे आमदारही निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पक्षाचे जिल्ह्यातील सर्व आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी बोलूनच खासदारकीच्या उमेदवारीबाबत निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी एका प्रश्नावर स्पष्ट केले.
|