धैर्यशील कदमांनी शड्डू ठोकल्याने पुन्हा तिरंगी? 

धैर्यशील कदमांनी शड्डू ठोकल्याने पुन्हा तिरंगी? 

कऱ्हाड - सुमारे दीड वर्षांपासून सक्रिय नसलेले कॉंग्रेसचे कऱ्हाड उत्तरचे नेते व वर्धन ऍग्रोचे अध्यक्ष धैर्यशील कदम यांनी 2019 च्या विधानसभेच्या आखाड्यात असणार असल्याचे काल स्पष्ट केले. भाजपने मनोज घोरपडे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहीर केली आहे. श्री. कदम यांनी रणशिंग फुंकल्याने कऱ्हाड उत्तरेत आमदार बाळासाहेब पाटील, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे यांच्यातील तिरंगी लढत पुन्हा पाहायला मिळेल? असे सध्याचे चित्र आहे. 

ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी प्रतिनिधित्व केलेल्या कऱ्हाड उत्तर मतदार संघाने 1999 पासून आमदार बाळासाहेब पाटील यांना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दिली आहे. उत्तरचे राजकारण साखर कारखान्याभोवती फिरते असे मानून श्री. कदम यांनी निवडणुकीनंतर वर्धन ऍग्रोची निर्मिती केली. त्यामुळे दोन वर्षांपासून त्यांचा लोकसंपर्क कमी झाला. हे खरे असले तरी 2014 च्या निवडणुकीत त्यांना साथ करणारे प्रमुख कार्यकर्ते आजही त्यांच्यासोबत असल्याचे दिसते. आता इच्छुकांसह राजकीय पक्षांना 2019 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चाहूल लागल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी कऱ्हाड येथे एका कार्यक्रमात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उत्तरमधून घोरपडे हे भाजपचे उमेदवार असल्याचे जाहीर केले. श्री. घोरपडे मतदार संघात सक्रियही आहेत. मात्र, सुमारे दीड वर्षांपासून मतदारसंघात सक्रिय नसलेल्या कदम यांनी 2019 च्या निवडणूक रिंगणात असेन असे जाहीर केले. दोन्ही कॉंग्रेसची आघाडी लक्षात घेऊन श्री. कदम यांनी उत्तरेतील कॉंग्रेसचे वाढलेले प्राबल्य पाहता कऱ्हाड उत्तर कॉंग्रेसला सोडावा, अशी मागणीही केली आहे. त्याची जागा वाटपावेळी कितपत दखल घेतली जाणार? याकडे लक्ष आहे. मात्र, 2019 च्या मतपत्रिकेवर धैर्यशील कदम हे नाव असेल, असेही त्यांनी सांगितल्याने प्रसंगी बंड करण्याचा इशाराच दिला आहे. पत्रकार परिषदेवेळी त्यांनी गेल्या वेळी मतविभागणीचा फटका बसल्याचे कबूल केले. सध्यातरी श्री. कदम, श्री. घोरपडे यांनी विधानसभेचे रणशिंग फुंकले असले, तरी आमदार विकासकामांच्या माध्यमातून मतदारसंघात संपर्क ठेवून आहेत. 

"ऍग्रो'मुळे आमदारांना विरोध करण्याचे "धैर्य'?  
वर्धन ऍग्रो कारखान्याद्वारे मतदार संघातील ऊस उत्पादक शेतकऱ्याला विद्यामान लोकप्रतिनिधीला यापुढे उघडपणे विरोध करण्याचे "धैर्य' निर्माण करण्याचे काम होणार असल्याचे श्री. कदम यांचे म्हणणे आहे. त्यामुळे आमदार पाटील यांच्या विरोधात काम करण्यास मतदारसंघातील किती जणांचे "मनोधैर्य' वाढण्यास "वर्धन ऍग्रो' यशस्वी ठरणार? यासाठी पुढच्या गळीत हंगामाची प्रतीक्षा करावी लागणार, हे नक्की. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com