कोल्हापूर जिल्ह्यात ४८ हजार अल्पभूधारक थकीत

कोल्हापूर जिल्ह्यात ४८ हजार अल्पभूधारक थकीत

मार्च २०१६ चे चित्र; वर्षांत ४ हजार शेतकऱ्यांची वाढ

कोल्हापूर - अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांपैकी ५२ हजार शेतकऱ्यांची कर्जे दोन वर्षे थकीत आहेत. यापैकी मार्च २०१६ अखेर ४८ हजार शेतकऱ्यांना आपल्या कर्जाची परतफेड करता आलेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार का? हा प्रश्‍न अजूनही गुलदस्त्यात आहे. 

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. कोल्हापुरातही आंदोलनाला प्रतिसाद मिळाला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी जाहीर केल्याप्रमाणे जून २०१६ अखेर थकीत कर्जदारांना कर्जमाफी दिली जाणार आहे. जे थकीत आहेत, त्यांनाच कर्जमाफी मिळणार आणि प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना यापासून वंचित ठेवणार का? असा सवालही आंदोलनानिमित्त उपस्थित केला जात आहे. राज्यातील ३८ ते ४० लाख अल्पभूधारक शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात लाखो अल्पभूधारकांनी आपल्या कर्जाची परतफेड केली आहे. तरीही जिल्ह्यातील ३१ मार्च २०१६ व २०१७ अखेर एकूण ५२ हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाची परतफेड केलेली नाही. मात्र सरकारने घातलेल्या अटीनुसार जून २०१६ अखेर थकीत असणाऱ्या अल्पभूधारकांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची शक्‍यता आहे.

जिल्ह्यात असे ४८ हजार शेतकरी आहेत. त्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्‍यता आहे. मात्र शासनाने याबाबत ठोस निर्णय घेतलेला नसल्याने भविष्यात होणाऱ्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यात १२ हजार २९ शेतकऱ्यांनी ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले आहे. ८ हजार ३७० शेतकऱ्यांनी ५० हजार रुपयांवरीत कर्ज घेतले आहे. तर ३ हजार २६८ शेतकऱ्यांनी १ लाखांपर्यंत कर्ज घेतले आहे. अडीच एकारापेक्षा कमी शेती असणाऱ्यांना अल्पभूधारक म्हणून ओळखले जाते. त्यांना एकरी ४० ते ६० हजार रुपये कर्ज दिले जाते. 

२०१६ ला पावसाने ओढ दिल्याने अनेकांची उभी पिके करपली होती. तसेच अपेक्षित ऊस लागणही झाली नव्हती. ज्यांचा ऊस चांगला आला होता, त्यांना एप्रिल-मे २०१५-१६ मध्ये पाण्याअभावी फटका बसला होता. त्यामुळे अनेकांना आपल्या कर्जाची परतफेड करता आलेली नाही. दरम्यान, यावर्षीही ४००० शेतकऱ्यांनी आपली कर्ज परतफेड केलेली नाही. जिल्हा बॅंकेकडील शेतकऱ्यांची ही परिस्थिती आहे. राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्येही परतफेड न झालेल्या शेतकऱ्यांचा आकडाही लक्षात घ्यावा लागणार आहे. 
 

जिल्हा बॅंकेकडील शेतकऱ्यांची माहिती 
 अडीच एकरापेक्षा कमी शेती असणारे अल्पभूधारक 
 लाखो अल्पभूधारकांपैकी ५२ हजार शेतकऱ्यांची कर्जे दोन वर्षे थकीत
 २०१७ मध्ये आणखी ४००० हजार शेतकऱ्यांची कर्जे थकीत
 १२ हजार २९ शेतकऱ्यांनी घेतले ५० हजार रुपयांचे कर्ज  
 ८ हजार ३७० शेतकऱ्यांचे ५० हजार रुपयांवर कर्ज  
 ३ हजार २६८ शेतकऱ्यांचे १ लाखांपर्यंत कर्ज 
 राष्ट्रीयीकृत बॅंकांकडे थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची वेगळी आकडेवारी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com