मोर्चावरून कोल्हापूरात सर्वपक्षीय फेरीवाला कृती समिती दुभंगली 

मोर्चावरून कोल्हापूरात सर्वपक्षीय फेरीवाला कृती समिती दुभंगली 

कोल्हापूर - महापालिकेतर्फे पंधरा दिवसांपासून अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई सुरू असतानाच आजच्या मोर्चावरून सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीत फूट पडली. आजच्या मोर्चात कृती समितीच्या निमंत्रकांनीच पाठ फिरविल्याने फेरीवाला कृती समितीतील काही दिवसांपासून सुरू असलेला वाद चव्हाट्यावर आला. 

दरम्यान, कारवाईच्या कालावधीत फेरीवाल्यांचे नेतृत्व करणारा एकही कार्यकर्ता कारवाईच्या ठिकाणी न फिरकल्याने त्यांच्याबद्दल फेरीवाल्यांत नाराजी व्यक्‍त होत आहे. 

शहरातील फेरीवाल्यांचा प्रश्‍न दहा-पंधरा वर्षातच निर्माण झाला, असे नाही. पूर्वीपासूनच फेरीवाल्यांना हटविण्याचा प्रयत्न होतो. प्रशासनापुढे एकटा विरोध करून चालत नाही. यातूनच फेरीवाल्यांची संघटना निर्माण झाली. कोल्हापुरातील फेरीवाल्यांच्या संघटनेचे संस्थापक (कै.) गोविंद पानसरे आहेत. त्यांनी 40 वर्षांपूर्वी फेरीवाल्यांची मध्यवर्ती बसस्थानकावर संघटना बांधली. त्यानंतर फेरीवाल्यांच्या विभागवार आणि पक्षनिहाय संघटना अस्तित्वात आल्या. फेरीवाल्यांवर अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई एकाचवेळी शहरात राबविली जात नाही. टप्प्याटप्प्याने ती राबविली जाते. याला सर्व फेरीवाले मिळून विरोध करू लागले. त्यातून सर्वपक्षीय फेरीवाला कृती समिती निर्माण झाली. 

फेरीवाला कृती समितीत डाव्या, उजव्या सर्व विचारधारा असणाऱ्या पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते आहेत. महापालिका शहरात ज्यावेळी अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करते, त्यावेळी ही समिती त्याच्या विरोधात उतरते. नवीन आयुक्‍त रुजू झाले, की ही समिती कार्यान्वित असते. 

आयुक्‍त नवीन आले, की त्यांची पहिली कारवाई अतिक्रमण निर्मूलनाची असते. मात्र, आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांनी तसे केले नाही. आठ ते दहा दिवस अगोदर त्यांनी जाहीर केले. त्यानंतर ज्यांच्या अनधिकृत केबिन आहेत, त्यांना त्या काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले. आयुक्‍तांच्या या निर्णयाच्या निषेधार्थ फेरीवाला सर्वपक्षीय कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार यांनी तातडीने बैठक बोलाविली. आणि त्याच्याविरोधात फेरीवाल्यांचा व्यवसाय बंद ठेवून मोर्चा काढण्याचा निर्णय जाहीर केला. मोर्चा काढण्याची तयारी सुरू झाली. मोर्चाच्या आदल्या दिवशी श्री. पोवार यांनी मोर्चा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय घेताना कृती समितीमधील काही जणांचा विरोध होता. मोर्चा काढावा, असे काही जणांचे मत होते. मात्र, श्री. पोवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हापासून सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीत अंतर्गत संघर्ष सुरू होता. 

मोर्चा काढण्याबाबत मतभेद 
बायोमेट्रिक कार्ड असणाऱ्यांवरही महापालिका कारवाई करीत असल्याच्या तक्रारी कृती समितीकडे केल्या. बैठकीत जशास तसे उत्तर देण्याची भाषा करणारे मात्र कारवाईच्या ठिकाणी सर्वपक्षीय फेरीवाला कृती समितीतील अपवाद वगळता एकही प्रमुख कार्यकर्ता फिरकला नाही. त्यामुळे फेरीवाल्यांमधूनही उघडपणे नाराजी व्यक्‍त होत होती. पुन्हा सर्वपक्षीय कृती समितीची दोन दिवसांपूर्वी तातडीची बैठक बोलाविली. बैठकीत आज मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. मात्र, हा मोर्चा काढण्याबाबत मतभेद झाले. रात्रीपर्यंत हा मोर्चा स्थगित करण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र त्यात यश आले नाही. आजच्या मार्चात कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, माजी महापौर नंदकुमार वळंजू आणि त्यांच्या गटाने सहभागी न होण्याचा निर्णय घेतल्याने कृती समितीतील वाद चव्हाट्यावर आला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com