जाब विचारणाऱ्यांची संख्या वाढली - अरुणा रॉय

जाब विचारणाऱ्यांची संख्या वाढली - अरुणा रॉय

कोल्हापूर - एकीकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असताना आता त्याचवेळी जाब विचारणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. भविष्यात ही संख्या आणखी वाढेल आणि सत्तेला उलथवून लावेल, असे स्पष्ट मत माजी आयएएस अधिकारी आणि राजस्थान मजदूर किसान शक्ती संघटनेच्या संस्थापक अरुणा रॉय यांनी व्यक्त केले. शहीद गोविंद पानसरे यांच्या तृतीय स्मृतिदिनानिमित्त आज झालेल्या स्मृती जागर कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

डॉ. अशोक चौसाळकर अध्यक्षस्थानी होते. श्रमिक प्रतिष्ठानतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवनात हा कार्यक्रम झाला. दरम्यान, ज्योती कांबळे लिखित ‘गोविंद पानसरे ः जीवन व कार्य’ चरित्रग्रंथ आणि ‘गांधींचा खून कुणी आणि का केला?’ या पुस्तिकेचे प्रकाशन कार्यक्रमात झाले.

‘लोकशाही व्यवस्थेतील समकालीन प्रवाह’ या विषयावर बोलताना रॉय यांनी देशातील स्थिती आणि जागतिक चित्र असा तौलनिक अभ्यासच मांडला. देशातील आणीबाणीपासून ते सध्याचे शिक्षणाचे खासगीकरण आणि बेरोजगारीपर्यंत त्यांनी विस्तृत विवेचन केले. त्या म्हणाल्या, ‘‘लोकशाही मानणाऱ्या स्वतंत्र देशात विचारवंतांच्या हत्या होतात. माहितीचा अधिकार बजावणाऱ्या कार्यकर्त्यांवर हल्ले होतात. विविध कारणांनी महिलांवरील आणि दलित, आदिवासींवर होणारे हल्लेही कमी झालेले नाहीत. मग, एकच प्रश्‍न उरतो, सरकार ठीक चालले आहे का? हा प्रश्‍न आता सामान्य माणसालाही पडला आहे आणि त्याचा जाब विचारण्यासाठी हळूहळू सारेच पुढे येऊ लागले आहेत. संविधानच बदलून टाकण्याचा डाव सध्या सुरू आहे आणि तो कदापिही यशस्वी होणार नाही. कारण संविधानाच्या चौकटीतच देशाची आजवरची वाटचाल सुरू राहिली आहे.’’

डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, ‘‘विचारवंतांच्या हत्येबाबत शासनानेच दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये त्यांच्या विचारांना विचाराने उत्तर देता येत नसल्याने हत्या झाल्याचे म्हटले आहे. तपास आणि न्यायालयाचा निकाल काहीही असो; पण लढाई सुरूच राहील. गेल्या साडेचार वर्षांतील विविध लढायांतून काय कमावलं, याविषयी त्यांनी विस्तृत विवेचन केले.

मेघा पानसरे यांनी न्यायालयीन लढाईबाबतची माहिती दिली. हिंसेवर आधारित धर्मांध वातावरण असले, तरी देशभरातील वातावरण हळूहळू बदलू लागले आहे आणि त्याचे सकारात्मक परिणामही आता दिसू लागतील, असेही त्या म्हणाल्या. श्रमिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. विलास रणसुभे यांनी प्रास्ताविक केले. उमेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. ज्योती कांबळे यांनीही मनोगत व्यक्त केले.

विरोधासाठीही जागा नाही...
दिल्लीत शासनाविरोधात ‘जंतरमंतर’वर आंदोलन करायचे तर ध्वनिप्रदूषणाचे कारण पुढे केले जाते. दुसऱ्या मैदानांवर आंदोलन करायचे तर त्याचे भाडे परवडणारे नाही. ज्या देशात विरोध व्यक्त करण्यासाठीही जागा नाही, त्या देशात लोकशाही खरोखर जिवंत आहे का, असा संतप्त सवालही रॉय यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com