सावध व्हा... डॉल्बीपासून दूर राहा

सावध व्हा... डॉल्बीपासून दूर राहा

कोल्हापूर - डॉल्बीच्या दणदणाटावर बेभान होऊन थिरकणाऱ्या तरुणाईने वेळीच सावध होत डॉल्बीच्या आवाजापासून दूर राहिलेले बरे, असा सावध इशारा वैद्यकीय क्षेत्रातून दिला जात आहे. तासन्‌तास धडधडणारा आवाज कानाचे पडदे, हृदयाच्या ठोक्‍यांची धडधड वाढवतात. यातून कमकुवत प्रकृतीच्या व्यक्तींना याचा धोका अधिक असतो. अशा डॉल्बीच्या दणदणाटाचा विपरीत परिणाम झाल्यास महिनोंमहिने उपचार आणि लाखो रुपयांचा खर्च याबरोबरच वेळ आणि कर्णबधिरता यामुळे आयुष्य अपंग करून घेण्याची वेळ येते. त्यामुळे अशा धडाकेबाज आवाजापासून दूरच राहिलेले बरे, असे मत वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.  गेल्या पाच वर्षांत गणेशोत्सव मिरवणुकीत धडधडणाऱ्या डॉल्बीनंतर महिन्याभरातच डॉक्‍टर कान दुखतोय, ऐकू कमी येते आहे, चक्कर आल्याचा भास होतो, हातापायातून मुंग्या येतात, कानात अजूनही तोच आवाज घुमत असल्याचा भास होतोय, क्वचित प्रसंगी कानातून रक्त येते, थोड्याफार अशाच तक्रारी घेऊन रुग्ण नाक-कान-घसा तज्ज्ञाकडे येतात. त्यानंतर आवश्‍यक त्या तपासण्या आणि उपचाराला सुरवात होते. काहींचा त्रास महिन्याभरात, काहींचा दोन महिन्यांत दूर होतो. परंतु, काही जणांना महिनोंमहिने औषधे घेण्याची, तपासणी करण्याची आणि प्रसंगी शस्त्रक्रिया करण्याची गरज पडते. अशातच लहान मुले किंवा वयोवृद्ध व्यक्तींवर उपचार करणे जिकिरीचे बनते. 

डॉल्बीच्या दणदणाटात तरुणाई नाचते. काळजी म्हणून त्यांच्याकडून कानात कापूस घातला जातो. मात्र, सर्वांनाच डॉल्बीच्या दणदणाटाचा त्रास होतो; पण काहींची रोगप्रतिकारशक्ती व धडधाकट प्रकृती यामुळे काही वेळानंतर हा त्रास दूर झाल्यासारखे जाणवते. मात्र, ज्यांची प्रकृती कमकुवत आहे. वयोवृद्ध अथवा लहान बाळ आहे किंवा गरोदर माता आहे, अशा घटकांना मात्र सतत धडधडणाऱ्या डॉल्बीचा त्रास अधिक होण्याची शक्‍यता असते. 

डॉल्बीच्या दणदणाटाचे धोके 
- लहान मुलांची एकाग्रता संपते. 
- वयोवृद्ध नागरिकांना हृदयविकाराचा धोका
- गर्भवती महिलांच्या गर्भाला धोका
- झोप कमी लागते
- मानसिक संतुलन ढासळते 
- चक्कर येण्याचे प्रमाण वाढते

क्षेत्रनिहाय आवाजाची मर्यादा -
क्षेत्र                    दिवसा (डेसिबल)             रात्री (डेसिबल)

औद्योगिक क्षेत्र            ७५                             ७०
व्यावसायिक क्षेत्र         ६५                              ५५
रहिवासी क्षेत्र              ५५                             ४५
शांतता क्षेत्र                ५०                             ४०

अधिक काळ डिजिटल आवाजाच्या गोंगाट्यात राहिल्याने नैराश्‍य येते. निद्रानाश, कानाचा आणि हृदयाचा त्रास उद्‌भवतो. पूर्वी ६० वर्षांच्या वयोगटातील व्यक्तींना डोक्‍याचा, कानाचा त्रास जाणवायचा. आता असा त्रास ४५ ते ५० वयोगटांतील व्यक्तींना जाणवू लागला आहे. 
- डॉ. आरती परुळेकर, कान-नाक-घसा तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com