मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याने साखरपट्ट्यातील राजकारण ढवळणार

मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याने साखरपट्ट्यातील राजकारण ढवळणार

कोल्हापूर - मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्याच्या निमित्ताने साखरपट्ट्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. माजी मंत्री विनय कोरे यांची भेट, हुतात्मा कारखान्यावरील कार्यक्रम यामुळे सहकाराच्या पंढरीत भाजपने पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली. 

भाजप सत्तेत आल्यापासून कोल्हापूरच्या राजकारणाची चक्रे उलटी फिरू लागली. पूर्वी शहरापुरता मर्यादित असलेल्या पक्षाने गावपातळीपर्यंत मजल मारली. जिल्हा परिषदही ताब्यात आहे. महापालिकेत चांगले संख्याबळ आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाने चांगले यश मिळविले. 

पूर्वी एखाद्या साखर कारखान्याची निवडणूक म्हटली की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पर्याय असायचा. बिद्री सहकारी कारखान्याच्या निमित्ताने भाजपने एंट्री करून सहकारात पहिले पाऊल टाकले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्थानिक नेत्यांना हाताशी धरून भाजपची चांगली मोट बांधली. भाजप सत्तेत आल्यापासून कोणकोणते नेते गळाला लागणार याची चर्चा झाली. कागलमधून समरजितसिंह घाटगे यांनी प्रवेश केला. नंतर कागल नगरपालिकेत त्यांनी नेत्रदीपक यश मिळविले. 
माजी मंत्री विनय कोरे यांना पक्ष प्रवेश केला नसला तरी भाजपच्या माध्यमातून राजकारण सावरण्याचा प्रयत्न केला आहे. दोन्ही काँग्रेसच्या काळात पारंपरिक ऊर्जामंत्री असलेले कोरे आता भाजपच्या जवळचे झाले आहेत. 

बिद्री कारखान्यातील भाजपच्या प्रवेशामुळे हसन मुश्रीफ आणि माजी आमदार के. पी. पाटील यांची कोंडी झाली आहे. एरव्ही थेट भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या मुश्रीफ यांना यापुढे जाहीर भूमिका घेणे अडचणीचे ठरणार आहे. खासदार धनंजय महाडिक हे २०१९ ती निवडणूक भाजपकडून लढतील, असे अंदाज बांधले जात असताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिल्याने त्यांना यू टर्न घ्यावा लागला. काँग्रेस नेते प्रकाश आवाडे यांचा पक्ष प्रवेश केवळ चर्चेपुरता मर्यादित राहिला.

कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. दहापैकी सहा आमदार सेनेचे आहेत. शिवसेनेला भविष्यात काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षा भाजपचेच आव्हान असणार आहे. जिल्ह्यात आठ आमदार आणि दोन्ही खासदार भाजपचे असतील असा विश्‍वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजपची पाळेमुळे घट्ट करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे.

मुख्यमंत्र्यांचा दौरा असा
मुख्यमंत्री देंवेद्र फडणवीस शुक्रवारी (ता. २४) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. दुपारी तीन वाजता उजळाईवाडी येथे विमानतळावर त्यांचे आगमन होईल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी ते जातील. पाच वाजता सावली केअर सेंटरचे उद्‌घाटन, सहा वाजता ॲपल सरस्वती हॉस्पिटलचा कार्यक्रम, सायंकाळी साडेसहानंतर माजी मंत्री विनय कोरे यांच्याशी वारणानगर येथे चर्चा, रात्री कोल्हापुरात सर्किट हाऊसला मुक्काम असा कार्यक्रम असेल. कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला सकाळी नऊ वाजता अभिवादन. तेथून हुतात्मा सहकारी साखर कारखाना (वाळवा. जि. सांगली) येथे इथेनॉल प्रकल्पाचा प्रारंभ, दुपारी साडेबारा वाजता कागल येथे समरजितसिंह घाटगे यांच्या बॅंकेचा नामकरण सोहळा व भेट नंतर कऱ्हाड तेथून शासकीय विमानाने मुंबईला रवाना असा कार्यक्रम आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com