कोल्हापूरात राष्ट्रवादीत वाढली खदखद...

कोल्हापूरात राष्ट्रवादीत वाढली खदखद...

कोल्हापूर - विश्‍वासू सेनापती विरोधकांना सामील झाल्यानंतर सैन्याची अवस्था जशी सैरभैर होते आणि राजा हतबल होतो, तशीच अवस्था सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली आहे. स्थायी समिती सभापती निवडीच्या धक्‍क्‍यातून राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते अजूनही सावरले नाहीत, तोपर्यंत स्थायी समितीचे माजी सभापती मुरलीधर जाधव यांनी पक्ष सोडण्याचा इशारा देऊन आणखी एक धक्‍का दिला. यामुळे राष्ट्रवादी पक्षात काही दिवसांपासून असणारी खदखद अधिकच वाढत असल्याचे स्पष्ट होते. 

महापालिकेत सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष श्री. महाडिक यांना सोबत घेऊन ताकदीने उतरली. तरीही काँग्रेस व राष्ट्रवादीने महापालिकेवरील आपली सत्ता कायम राखण्यात यश मिळविले. त्यासाठी शिवसेनेची मदत घ्यावी लागली. महापालिकेतील सत्ता स्थापन केल्यानंतर प्रत्येक पदाधिकारी निवडीत नेत्यांना कसरत करावी लागते. मात्र, महापालिकेतील कारभारासाठी सेनापती म्हणून ज्यांची निवड केली, त्यांची भूमिका महत्त्वाची असे. महापालिकेत त्यांच्या शब्दाला वजन असायचे. काही वर्षापासून नवीन सेनापती पक्षात तयार होऊ लागल्यामुळे राष्ट्रवादीत धुसफूस सुरू झाली. त्याचे पडसाद नगरसेवकांच्या फुटीतून उमटत आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक आहेत. काँग्रेससोबत त्यांची आघाडी आहे. पदांची संख्या पाहता बहुतांशी सदस्यांना पदे मिळण्याचीही शक्‍यता आहे. तरीही राष्ट्रवादीच्या सदस्यांना दम निघत नाही, असेच म्हणावे लागेल. स्थायी निवडीत शिक्षण समितीचे माजी सभापती अजिंक्‍य चव्हाण व सभापतिपदासाठी इच्छुक असणारे अफजल पिरजादे यांनी पक्षाच्या विरोधात मतदान केले. श्री. चव्हाण व श्री. पिरजादे फुटतील, असे कोणालाही वाटत नव्हते. मात्र, त्यांनी सभागृहात बिन आवाजाचा बॉम्ब फोडला.

या बॉम्बची चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे माजी स्थायी सभापती मुरलीधर जाधव यांनी पक्षातून बाहेर पडण्याची धमकी दिली. श्री. जाधव यांनी आपल्यावर अन्याय होतोय, प्रामाणिक राहूनही पदासाठी डावलले जाते म्हणून बंडाची भाषा केलेली नाही, तर राष्ट्रवादीचे प्रमुख कार्यकर्ते प्रा. जयंत पाटील यांच्यावर अन्याय होतोय, त्यांचा अवमान होतोय म्हणून त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला. 

चव्हाण, पिरजादे यांच्यानंतर आता जाधव
श्री. चव्हाण, श्री. पिरजादे यांच्यानंतर आता मुरलीधर जाधव यांनी नंबर लावला आहे. यावरून राष्ट्रवादीत असणारी खदखद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. दुसरीकडे महापौर निवडणूक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत आपला महापौर करण्याचा प्रयत्न करत आहे. त्याची वाटचालही सुरू आहे. त्याला रोखायचे असेल तर सेनापती आणि त्यांची फौज दक्ष राहिली पाहिजे. मात्र, आणीबाणीच्या काळातच राष्ट्रवादीचे सेनापती विरोधकांना मिळाल्यामुळे फौज सैरभैर होणे स्वाभाविक आहे. तशीच परिस्थिती सध्या राष्ट्रवादीची झाली आहे. त्यामुळे यापुढे नेत्यांचा कस लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com