कोल्हापूर - शेतकरी नेते जयाजीराव सूर्यवंशी यांना व्हिलन ठरवू नका, कर्जमाफीचा पाया त्यांनीच रचला. त्यांचा गावोगावी सत्कार करायला हवा, अशा शब्दांत भाजप नेते महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जयाजीराव यांची आज पाठराखण केली.
पाटील म्हणाले, 'जयाजीराव यांना व्हिलन ठरविण्याची गरज नाही. उलट जयाजीराव आणि पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी केलेल्या संपाची दखल सरकारला घ्यावी लागली. शेतकरी संपापूर्वी अनेक नेत्यांनी आणि पक्षांनी वेगवेगळ्या यात्रा काढल्या; पण त्याचा काही परिणाम झाला नाही.
जयाजीराव आणि त्यांच्याबरोबरील शिष्टमंडळाच्या चर्चेत पाच एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केलेली होती. नंतरच्या बैठकीत 35 शेतकरी संघटनांशी झालेल्या चर्चेत काही निकषांवर सरसकट कर्जमाफीचा निर्णय झाला. त्यामुळे जयाजीराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एकूण कर्जमाफीचा पाया रचला, तर इतर संघटनांनी दुसऱ्या बैठकीत त्यावर कळस चढविला, असे म्हटले पाहिजे. याचे श्रेय कोणाला घ्यायचे त्यांना घेऊ दे.''
|