रोजगार हमी योजना वनरक्षकांसाठी डोकेदुखी

रोजगार हमी योजना वनरक्षकांसाठी डोकेदुखी

कोल्हापूर - शतकोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. यात जिल्ह्यात नव्याने जवळपास ४० लाख रोपे लावण्यासाठी रोजगार हमी योजनेअंर्तगत काम देऊन रोपेलागवड व रोपे तयार करण्याच्या सूचना वन विभागाकडून आल्या आहेत. त्याची जबाबदारी वनरक्षकांकडे आहे; मात्र रोजगार हमीच्या कामांसाठी मनुष्यबळ मिळत नाही, तर नियम-अटींमुळे पर्यायी मनुष्यबळ असूनही त्याचा वापर करता येत नाही, असा पेच निर्माण झाला आहे. अशातून वृक्ष लागवडीच्या उद्दिष्टपूर्ततेला खीळ बसण्याची शक्‍यता आहे.    

रोजगार हमीची कामे ग्रामपंचायतीतर्फे देण्यात येतात. वन विभागाच्या हद्दीत वृक्षलावगड व रोप तयार करणे अशी कामे रोजगार हमीत द्यावीत, अशा सूचना आहेत; मात्र पूर्वी वन विभागात खड्डे मारण्यासाठी दहा लोक बोलवले की, वीस लोक येत. आता अन्य पर्याय उपलब्ध झाल्याने वीस लोकांना बोलावले तरी दोन लोकही येत नाहीत. त्यामुळे वनरक्षकांना रोजगार हमीतून वृक्षलागवड उद्दिष्ट सफल करणे मुश्‍कील बनले आहे.  

जिल्ह्यात ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण केले. त्यानंतर पुन्हा ४० लाख रोपनिर्मिती व लागवडीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी रोजगार हमी तत्त्वावर शेतमजुरांना कामे देण्याची सूचना वनरक्षकांना आली आहे. यामुळे एक ग्रामपंचायत व एक वनरक्षकाच्या गटाकडून हे काम करायचे आहेत. त्यानुसार तीनशेवर ग्रामपंचायती व तीनशेवर वनरक्षक, वनपाल यांच्यावरही जबाबदारी आहे.  

पारंपरिक पद्धतीने खड्डे मारण्याचे काम करणाऱ्या महाराष्ट्र तसेच कर्नाटकात विशिष्ट कष्टकऱ्यांचे समूह आहेत. त्यांच्याकडून ठेकेदारी पद्धतीने खड्डे मारण्याची कामे घेण्यात येतात; मात्र ते बहुतेक स्थलांतरित असतात. त्यामुळे स्थानिक मजुरांनाच काम द्यावे लागते.  स्थलांतरित मजुरांना हे काम दिले जात नाही आणि स्थानिक मजूर येत नाहीत, अशा स्थितीत उद्दिष्टपूर्तीचे आव्हान असेल. वनरक्षक वनपालांना वन्यजीवांची काळजी घेणे, वृक्षसंवर्धन, संरक्षण करणे, वणवे नियंत्रणात आणणे या पासून कार्यालयीन कामकाजही असते. त्यांना रोजगार हमीच्या कामावरील नियंत्रण ठेवणे किंवा पूरक कामांसाठी जुंपल्यास वनाशी संबंधित कामवर परिणाम होऊ शकतो, अशी चर्चा वनरक्षक वनपालात आहे.

रोजगार हमीच्या कामासाठी पर्यायी मनुष्यबळाचा वापर करावा लागेल. दोन महिन्यांपूर्वी वनरक्षक व वनपालांनी वृक्षलागवड मोहीम यशस्वी केली. तितक्‍याच हिमतीने उर्वरित मोहीमही पूर्ण करू; मात्र वनपाल वनरक्षकांच्या अन्यायी वेतन श्रेणीबाबत नाराजी आहे. याचा विचार करून वेतनश्रेणी सुधारावी.
- दत्ता पाटील, जिल्हाध्यक्ष,
वनपाल वनरक्षक संघटना

महिला बचत गटांना सामावून घ्यावे
वृक्ष लागवडीचे राष्ट्रीय काम म्हणून स्थलांतरित मजुरांना खड्डे मारण्याचे काम दिले तरीही मोहीम यशस्वी होऊ शकते. ग्रामीण भागातील महिला बचत गटात अनेक महिला शेतमजूर महिला आहेत. त्या अनुभवी असल्याने त्यांना रोपे तयार करण्याचे काम देणे आवश्‍यक आहे. त्यासाठी महिला बचत गटांना या मोहिमेत अधिकृतरित्या सामावून घ्यायला हवे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com