कर्जमाफीच्या कालमर्यादेत बदल शक्‍य 

कर्जमाफीच्या कालमर्यादेत बदल शक्‍य 

कोल्हापूर - कर्जमाफी योजनेतील दिड लाखापेक्षा जास्त असलेल्या कर्जदारांसाठी जाहीर केलेल्या एकरकमी कर्जपरतफेड योजनेची कालमर्यादा वाढवली जाण्याची शक्‍यता आहे. त्याचबरोबर व्याज सवलत योजनेलाही सप्टेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ मिळेल,असे सूत्रांकडून समजते. व्याज सवलत योजनेचा फायदा मिळवण्यासाठी कर्ज भरण्याचा आज अंतिम दिवस होता, पण कर्ज भरण्यासाठी विकास सोसायटी किंवा जिल्हा बॅंकेत गर्दी नव्हती. 

राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी 17 जूनला क्षेत्राची अट काढून कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेत दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ होणार आहे तर प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 25 हजार रूपये देण्यात येणार आहेत. दिड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदारांनी वरील रक्कमेचा परतावा केल्यानंतरच या योजनेतील दिड लाखाची कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यावर जमा होणार आहे.एकरकमी कर्ज परतफेड योजना या नावाखाली हा लाभ मिळणार आहे. 

या कर्जमाफीसाठी 30 जून 2016 पर्यंत थकित असलेल्या कर्जांचा विचार केला जाणार आहे. पण आता या योजनेत सप्टेंबर 2016 पर्यंतच्या कर्जाचा समावेश करण्याचा विचार शासन पातळीवर सुरू आहे. दिड लाखापेक्षा जास्त असलेले कर्ज तातडीने भरणे शक्‍य नसल्यानेच ही मुदत देण्यात येणार असल्याचे या क्षेत्राशी संबंधित सूत्रांनी सांगितले. 

प्रामाणिकपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना त्यांच्या कर्जाच्या 25 टक्के रक्कम शासनाकडून परत दिल जाणार होती. पण हे कर्जही भरण्याची शेवटची तारीख आज (ता. 30 जून) होती. 17 जून रोजी कर्जमाफीचा निर्णय झाला, 24 जूनला त्यासंदर्भातील आदेश व निकष अधिकृतपणे निघाले. त्यानंतर केवळ सहा दिवसच कर्ज भरण्याची मुदत होती. एवढ्या कमी कालावधीत एवढी रक्कम भरायची कोठून हा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर होता. त्यामुळे ही मुदत वाढवली जाईल,असे समजते. 

केंद्र व राज्य शासनाच्यावतीने वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेतही कर्ज भरण्याची अंतिम मुदत आज होती. जिल्ह्यात एकूण पीक कर्ज वाटपाच्या 28 टक्के रक्कम वसूल झालेली नाही. त्यामुळे ही रक्कम ज्या शेतकऱ्यांकडे आहे, त्यांना या व्याज सवलत योजनेचा तर लाभ मिळणार नाहीच पण शासनाच्या 25 टक्के कर्जाची रक्कम परत देण्याच्या कर्जमाफी योजनेतीलही लाभ मिळणार नाही. त्यामुळे हे कर्ज भरण्यासाठीही सप्टेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ मिळण्याची शक्‍यता आहे. 

कर्ज भरण्यास गडबड नको-शेट्टी 
शासनाने ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यायचा असेल त्यांना 30 जूनअखेर कर्ज भरण्यास सांगितले आहे. मात्र, सर्व शेतकऱ्यांची तशी अर्थिक परिस्थिती नसल्याने कोणीही कर्ज भरण्यास गडबड करू नये. आपण शासनाकडून यासाठी मुदतवाढ घेणार असल्याचे "स्वाभिमानी' चे खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com