पंचगंगेचे प्रदूषण करणाऱ्यांवर येत्या ४८ तासांत कारवाई करा - कदम

 पंचगंगेचे प्रदूषण करणाऱ्यांवर येत्या ४८ तासांत कारवाई करा - कदम

जयसिंगपूर - पंचगंगेचे प्रदूषण करणाऱ्यांवर येत्या ४८ तासांत कठोर कारवाई करा; अन्यथा मी तुमच्यावर कारवाई करेन, असा सज्जड दम पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर यांना गुरुवारी दिला. 

यानंतर खडबडून जागे झालेल्या मंडळाने कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी पालिकेवर कारवाईच्या हालचालींना प्रारंभ केला. दरम्यान, वारणेच्या पाण्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. 
आदेशानुसार ४८ तासांत कारवाई होणार का, याकडे लक्ष लागून राहिले आहे. 

आमदार उल्हास पाटील यांनी मुंबईत श्री. कदम यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यात म्हटले आहे, की वारणेतून इचलकरंजीला पाणी देण्यास दानोळीसह वारणाकाठच्या लोकांनी तीव्र विरोध केला आहे. साडेचारशे पोलिसांच्या फौजफाट्यासह आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध झाल्यानंतर भूमिपूजनाचा घाट उधळला गेला. आधी पंचगंगा प्रदूषित झाली. कृष्णाही त्याच वाटेवर आहे. त्यामुळे अन्य नद्यांमधून पाणीपुरवठ्याचा आग्रह होत आहे.

नदी प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची गरज आहे, तरच नदी स्वच्छ राहील. इतर नद्यांवरही ताण पडणार नाही. आजवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पाहणी आणि अहवाल यातच वेळ घालवला आहे. प्रत्यक्षात कारवाई होत नाही. परिणामी, घटकांकडून बिनधास्तपणे प्रदूषण केले जात असल्याचे आमदार पाटील यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. 

यानंतर श्री. कदम यांनी खेडकर यांना दूरध्वनीवरून कठोर कारवाईचे आदेश दिले. येत्या ४८ तासांत कारवाई झाली पाहिजे; अन्यथा मी तुमच्यावर कारवाई करेन, असा दमही भरला. 

श्री. कदम यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. पहिल्या टप्प्यात कोल्हापूर महापालिका आणि इचलकरंजी पालिकेला नोटीस दिली जाईल. यानंतर कठोर कारवाई करू. टप्प्याटप्प्याने अन्य घटकांवर कारवाई करू. 
- दिलीप खेडकर,
प्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ

माझा फोन हाच आदेश...
श्री. कदम यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ‘माझा फोन हाच आदेश समजा. वेगळ्या आदेशाची वाट पाहू नका,’ असे दूरध्वनीवरून खडसावले. 

पंचगंगेच्या प्रदूषणामुळेच आज वारणेच्या पाण्यावरून वाद निर्माण झाला आहे. जखम डोक्‍याला आणि पट्टी गुडघ्याला अशी स्थिती आहे. पंचगंगाच प्रदूषणमुक्त झाली तर वारणेचा प्रश्‍नच निर्माण होणार नाही. दानोळीतून इचलकरंजीला पाणी दिल्यास भविष्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण होऊ शकते. वारणा नदीवर ताण पडू द्यायचा नसेल तर पंचगंगा प्रदूषणमुक्त झालीच पाहिजे. त्यासाठी पाठपुरावा करू.
- उल्हास पाटील, 

आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com