भीती झुगारून द्या, भविष्य घडेल

कोल्हापूर - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘समर यूथ समीट’चा समारोप गुरुवारी झाला. या वेळी रोहित पाटील याचा सत्कार महेश काकडे यांनी केला.
कोल्हापूर - डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘समर यूथ समीट’चा समारोप गुरुवारी झाला. या वेळी रोहित पाटील याचा सत्कार महेश काकडे यांनी केला.

कोल्हापूर - शिवचरित्र केवळ जयजयकारासाठी नव्हे, तर डोक्‍यात घेऊन जीवनाचा प्रवास करण्याचे आहे. शिवछत्रपतींप्रमाणे भीती झुगारून द्याल तरच भविष्य घडेल. अपयश आले म्हणून खचून न जाता सरावात सातत्य ठेवा आणि पाहा अवघे आकाश तुमचे असेल. इतरांना सन्मान देत राहाल, तर तुमच्या वर्तमानावर सुंदर आयुष्य आकार घेईल, असा मौलिक उपदेश आज वक्‍त्यांनी येथे केला. 

डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ‘समर यूथ समीट’चा आज समारोप झाला. दिवसभरात विविध वक्‍त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत प्रेरणा दिली. शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक महेश काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘समीट’चा समारोप झाला. 

स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी प्रस्तुत व नीलया एज्युकेशन ग्रुप पॉवर्ड बाय असणाऱ्या शिबिरासाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्ट व विद्या प्रबोधिनी यांचे सहप्रायोजकत्व होते. वि. स. खांडेकर भाषा भवनमध्ये समीट झाले. यिन समन्वयक सूरज चव्हाण याने संयोजन केले.

श्री. काकडे म्हणाले, ‘‘जे जे सभोवताली आहे ते माहितीचे जंगल आहे. माहितीला संस्कार देऊन तिचे रूपांतर ज्ञानात करू शकतो का?, कृतीतून ते सवयीत उतरू शकतो का?, याचा विचार तरूणाईने केला पाहिजे. अज्ञानातून ज्ञानाकडे वाटचाल करणे, हा यशाचा मार्ग आहे. एकत्र येणे ही यशाकडे जाण्याची सुरवात आहे. प्रसिद्धी, पैसा, सन्मान मिळविण्यासाठी संस्कारांची शिदोरी तुमच्यासोबत ठेवा. भौतिक सुखे मिळविण्यासाठीची पात्रता विनयाने येते. भारतीय संस्कृतीचे सार  भगवद्‌गीता, उपनिषदांत आहे. त्याचा अर्थ जाणून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले. 

प्रत्येक स्पर्धा खूप शिकवणारी 
माझे मार्गदर्शन करण्याचे वय नाही. तरीही कुस्ती प्रवासाबद्दल थोडे सांगते. वयाच्या चौथ्या वर्षांपासून मी कुस्तीला सुरुवात केली. ऑलिंपिकमध्ये पदक मिळवावे, या वडिलांच्या इच्छेने मी कुस्तीत ओढले गेले. सहावीला असताना पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळले. त्या वेळी पैलवानकीचा आहार घ्यायचे. खूप सराव करायचे. कुस्ती व शाळेचा मेळ साधताना त्रास व्हायचा. कुस्ती नको वाटायची. यश मिळवत गेल्यानंतर आत्मविश्‍वास वाढत गेला. इंडियाचा कोट घालताना खूप आनंद झाला. स्पर्धेसाठी हरियाना, दिल्लीला जावे लागले. एकदा तर वडिलांकडे थोडे पैसे कमी पडल्याने विमानात बसायची संधी हुकली. वडिलांच्या प्रोत्साहनाने नववीला असताना पहिल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेनिमित्त विमानात बसायची संधी मिळाली. पहाटे चार वाजता उठून सरावाला सुरुवात होते. आठवड्यातून दोन वेळा जिम करावी लागते. स्पर्धेबाबत सांगायचे, तर परदेशातील कुस्तींपटूंविरोधात टिकू शकू की नाही, याचा तणाव असतो. तो कमी करण्यासाठी मेडिटेशन, योगाचे प्रशिक्षण घेतले आहे. अपयश येते, म्हणून खचायचे नाही. सरावात सातत्य ठेवले तर खूप काही शक्‍य होते. पुण्याला एकदा स्पर्धा होती. पण तेथे जायला मिळाले नाही. तरीही हुशार मुलींसोबत माझा सत्कार झाला. त्यावेळीच ठरविले की, आपला खरा सत्कार झाला पाहिजे. आता २०२० ला ऑलिंपिकमध्ये पदक मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. 
 - अथक सराव हेच यशाचे गमक 
 - जपानी मल्ल टेक्‍निकली फास्ट
  - कुस्ती आपल्याच डोक्‍यानेच करावी
 - स्वत:ला कमी समजणाऱ्यांकडून आरोप होतात

भरारी घेण्यासाठी गडकोट धुंडाळा

प्रेरणा गडकोटांच्या ठायी-ठायी विसावल्या आहेत. सह्याद्रीच्या अंतरंगात त्या वसल्या आहेत. या प्रेरणा घेऊन जीवनाचा प्रवास केला, तर देशाच्या विकासास त्या पूरक ठरणार आहेत. त्या कळण्यासाठी मात्र काही गोष्टी अनुभवातून समजून घ्याव्या लागतात. तुम्ही कधी मातीत लोळले आहात, तुमचे गुडघे फुटले आहेत का, किल्ल्याची परिक्रमा कधी केली आहेत का, पन्हाळा-पावनखिंड मोहीम चालत पूर्ण केली आहे का, विंचू चावलाय काय? याचा अनुभव घेतला असेल, तर जीवनात आपण खूप काही शिकल्यासारखे आहे. शिवचरित्र का अभ्यासायचे, याचे उत्तर शोधण्याचा तो एक राजमार्ग आहे. लक्षात ठेवा की, बंद पुस्तकाच्या पलीकडेही आयुष्य आहे. आज आयटी क्षेत्रात सर्वात जास्त आत्महत्या होत आहेत. संघर्षातून माणूसपण हरविले आहे. हा संघर्ष संपवून भरारी घ्यायची असेल, तर गडकोट धुंडाळले पाहिजेत. कारण गडकोटांवर चरित्र घडते, तेच राष्ट्रीय चारित्र्य घडवते. भटकंतीचे क्षितिज मोठे आहे. तेथे कितीही ओरडलो तर कुणीही ऐकायला नसते. शिवचरित्र म्हणजे फक्त जयजयकारासाठी नव्हे, तर ते समजून घेण्यासाठी आहे. शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग मार्गदर्शन करणारा आहे. बुलंद आत्मविश्‍वास मिळवायचा असेल, तर गडकोटांवर भटकंती करा. गडकोटांची पुनर्बांधणी हा एक करिअरचा भाग आहे, हे लक्षात घ्या. 
 - किल्ले स्वच्छ ठेवणे हेच आपले कर्तव्य
 - गडकोट हीच राष्ट्राची धारातीर्थे
 - गडकोट गुपचूप भेटायची ठिकाणे नव्हेत
 - शिवजयंतीच्या तारखेचा वाद राजकारण्यांच्या सोयीचा

आपणही भविष्य घडवू शकतो

कुणाला बाईक, मर्सिडीज, तर कुणाला ऑडी घेण्याचे स्वप्न आहे. कुणाला अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर यांच्यासारखे बनायचे आहे. जीवनाची असंख्य स्वप्नं पूर्ण करण्यासाठी जो तो धडपडतोय. आयुष्य मस्तीत जगण्यासाठी मात्र सुंदर शिक्षण हवे असते.

मी घडल्यानंतर समाजालाही घडविणार, ही प्रवृत्ती अंगी बाणवावी लागते. माणसाचे भविष्य त्याच्या वर्तमान काळावर ठरते. माणूसच स्वत:ला बदलू शकतो. वाल्याचा वाल्मिकी बनू शकतो, तर मग आपणही हव्या त्या पद्धतीने घडू शकतो. कारण आपल्यात प्रचंड क्षमता आहेत. तुमचे आई-वडील तुमच्यात स्वप्नं बघत आहेत. लालेलाल डोळे झालेल्या लोहारच्या डोळ्यातही मुलाने काय व्हावे, याचे स्वप्न असते. ते पूर्ण करण्यासाठी मुलाने धडपडले पाहिजे. आयुष्यात पैसा सगळे काही देऊ शकत नाही आणि पैसाशिवाय आपण काही करू शकत नाही, याचा अर्थ समजून घेऊन प्रवास करायला हवा. 

पैसा व आयुष्य या दोन्ही गोष्टी सुंदर करायच्या असतील काहीतरी वेगळे करून दाखविण्याची गरज आहे. आपले आयुष्य तर क्षमतांनी पुरेपूर भरलेले आहे. इच्छा कागदावर उतरवून लक्ष केंद्रित करा. तीन-चार वर्षे पूर्ण करिअरला द्या. प्रेमात जरूर पडा; पण त्यातून उभारायला शिका. 
 - आधुनिक कौशल्ये आत्मसात करा
 - सॉफ्ट स्किल करिअरला आकार देणारी
 - कम्युनिकेशन स्किल हस्तगत करा
 - भीती झुगारून द्याल तरच जग घडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com