नैतिकतेची छमछमणारी छडी गेली कुठे...?

नैतिकतेची छमछमणारी छडी गेली कुठे...?

कोल्हापूर  - ‘छडी लागे छम छम, विद्या येई घम घम’ अशी एक म्हण होती. काही अंशी ही म्हण खरीही होती. कारण छडी मारणाऱ्या शिक्षकांबद्दल शंका व्यक्त करण्याची कोणाची हिंमत नव्हती.

किंबहुना शिक्षकांनी एक छडी मारली, असे विद्यार्थ्याने घरात सांगितले तर ‘‘बरं झालं. आणखी एक मारायला हवी होती,’’ अशीच प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त होत होती. कारण शिक्षक, त्याची शिकवण्याची तळमळ याबद्दल आदरार्थीच भावना होती आणि या भावनेतूनच शिक्षकाच्या हातातील छडीबद्दल कधी कोणाची तक्रार नव्हती. पण चंदगड येथील विद्यार्थिनीला एका शिक्षिकने चक्क ५०० उठाबशा काढायची शिक्षा दिली. त्या विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर झाली आणि एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षा करण्याइतपत पात्रतेचे, तळमळीचे शिक्षक किती उरलेत या दबलेल्या चर्चेने पुन्हा बऱ्यापैकी उचल घेतली. 

शिक्षकाने जरूर विद्यार्थ्यांना हलकी फुलकी शिक्षा करावी, अशी बहुतेक पालकांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पण घरातला, संघटनेतला, संस्थेतला राग विद्यार्थ्यांवर शिक्षेच्या रूपातून व्यक्त करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली. चंदगड येथे विद्यार्थिनीला एका शिक्षिकेने केलेल्या शिक्षेबद्दल सर्वांनीच चीड व्यक्त केली. या शिक्षिकेलाही तशीच हजार उठाबशा काढण्याची शिक्षा द्यावी, अशा पालकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या. मात्र या निमित्ताने आपणही लहानपणी शाळेत शिक्षकांच्या छड्या खाल्ल्याची, अंगठे धरून उभे राहिल्याची, डस्टरने उलट्या हातावर ठोका खाल्ल्याची शिक्षा अनुभवली असल्याची कबुली बहुतेकांनी दिली. मात्र अशी शिक्षा देणाऱ्या शिक्षकांतील तळमळ व नैतिकता आजही सर्वांनी मान्य केली.

शाळा म्हटलं की शैक्षणिक साधनांबरोबरच छडी हा एक महत्त्वाचा घटक होती. किंबहुना या छडीच्या भीतीने घरचा पाठ करण्याची भावना विद्यार्थ्यांत होती. काही काही शिक्षक तर ‘मारकुटे’ म्हणूनच त्यांची ओळख होती. या शिक्षकांनी मारले तर घरात तक्रार करण्याची विद्यार्थ्यांतच धमक नव्हती. कारण घरातले पालक आपली नव्हे तर शिक्षकाचीच बाजू घेणार याची विद्यार्थ्याला खात्री होती. याला कारण होते ते मन लावून, तळमळीने शिकवणारे शिक्षक. पाढे असे म्हणून घेत होते की, झोपेतून उठवून साती-आठी किती? असा प्रश्‍न विचारला तर पोरगं ‘छप्पन्न’ असेच उत्तर देत असे. कविता म्हटल्यासारखं सुरात पाढे म्हणून घेण्यावर, पाठ करून घेण्यावर शिक्षकांचा भर असे आणि त्यातून त्यांनी एखाद्याला छडी मारली तर ते माफ असे ठरलेलेच असे.

आज चित्रच बदलले आहे. बीएड, डीएडला देणगी, नोकरी लागताना देणगी असे पाच-सहा लाख रुपये खर्च करून काही मंडळी नोकरीस लागली आहेत. काही संस्थांत कागदावर पगार पाच आकडी, पण प्रत्यक्षात हातात पगार चार आकडी आहे. शिकवण्याशिवाय इतर कामाचा त्यांच्यावर भार आहे. नोकरीतून कधीही काहीही कारण सांगून काढून टाकतील ही भीती आहे आणि त्याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत आहे व तो राग विद्यार्थ्यांवर निघत आहे. आणि त्याला कधीही माफ करता कामा नये, अशीच सर्वांची भावना आहे.

जो शिक्षक वैयक्तिक आयुष्यात शिस्त पाळतो, त्यालाच विद्यार्थ्याला शिक्षा करण्याचा अधिकार आहे. घरातला राग विद्यार्थ्यावर काढणे योग्य नाही.
 - डी. बी. पाटील,
शिक्षक, पाडळी

शिक्षकांवर शैक्षणिक कामापेक्षा इतर कामाचे दडपण आहे. पण म्हणूनच विद्यार्थ्यांवर तो राग व्यक्त करणारा शिक्षक पदास पात्र नाही.
- बाबासाहेब चव्हाण, 

निवृत्त मुख्याध्यापक 

शिक्षा न देता शिक्षण देणाराच खरा शिक्षक. शिक्षकाचे काम शिकवण्याचे आहे. त्याने शिकवलेले विद्यार्थ्याला समजले नाही तर तो विद्यार्थी कच्चा नव्हे तर शिक्षकाची कार्यक्षमता कमी असते.
- सुधाकर सावंत,
शिक्षक

शिक्षकांचा मार आम्ही खाल्ला आहे. पण त्या शिक्षकांचा कधी राग आला नाही. उलट त्यांनी छड्या मारून पाढे पाठ करून घेतल्याने माझे गणित चांगले झाले. पण आता माझ्या मुलाच्या शाळेतील शिक्षक वर्गात मोबाईलवर बोलत असतो. त्या शिक्षकाला विद्यार्थ्याला मारण्याचा अधिकार नाही.
- माधव सरनोबत,
पालक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com