मुंबईची चाकरी सोडून साठ तरुणांनी धरली शेतीची वाट 

मुंबईची चाकरी सोडून साठ तरुणांनी धरली शेतीची वाट 

प्रकाश कुंभार, मृद्‌संधारण अधिकारी 
देशातील सत्तर टक्के लोक शेती करीत असले, तरी आतबट्ट्यातील शेतीमुळे तरुणाई शेतीपासून दूर गेली होती. कोकणातून मुंबईकडे चाकरीसाठी जाणाऱ्या तरुणांचे लोंढे मोठ्या प्रमाणात आहेत. मी कृषी विस्तारकाचे काम करीत असताना कोकणातून मुंबईच्या वाटेवर चाकरीसाठी निघालेल्या साठ तरुणांना शेती व शेतीपूरक व्यवसायाकडे वळविले. आजच्या घडीला या सर्व तरुणांनी शेतीतूनही वेगळे करीअर घडविता येते हे सिद्ध करत या संधीचे सोने करताना मी अनुभवतो आहे. 

नोकरीच्या मागे न लागता छोट्या-छोट्या उद्योगाकडे वळावे, म्हणणे व्यासपीठावरून भाषण देताना सोपे असते. प्रत्यक्षात तरुणांना छोटे उद्योग करण्यासाठी प्रेरणा देणे, त्यासाठी मदत करणे आणि त्यातही ते यशस्वी झाल्याचे पाहून मिळणाऱ्या समाधानाला मी अधिक महत्त्व देतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कृषिविस्तारक म्हणून काम आठ-दहा वर्षे खडतर नव्हे, समाधानाने गेली. 

गावातच प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. अर्थात पहिल्यापासून शेतीची आवड होती. त्यामुळे कोल्हापूरात बी. एस्सी. (ऍग्री)ची पदवी घेतली. राहुरी येथे एम.एस्सी झालो. पहिल्याच प्रयत्नात स्पर्धा परीक्षेचा कोणतेही स्वतंत्र वर्ग न लावता एमपीएससी झालो. वडील प्राथमिक शिक्षक असले तरी त्यावेळच्या पगारात मोठे कुटुंब जगविण्यासाठी शेतीकडे लक्ष द्यावेच लागे. साहजिकच शेतीविषयाची मला आवड निर्माण झाली होती. नोकरीत काम करताना पगार मिळणारच होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आठ वर्षे आणि रायगड जिल्ह्यात अशी दहा वर्षे कोकणात सेवा केली. कोकणातून नोकरी, व्यवसायासाठी मुंबई गाठणाऱ्या तरुणांची संख्या होती आणि आजही आहे. त्यांना व्यवसायासाठी प्रशिक्षण घेण्यासाठी तयार केले. पहिली दोन वर्षे स्थिरावण्यात गेल्यानंतर प्रत्येक वर्षी आठ-दहा तरुणांना घरदार सोडून मुंबईला जाण्याऐवजी शेतीतील छोट्या व्यवसायाकडे वळवले. तेव्हा मलाही याबाबत काही विशेष वाटले नाही, मात्र आज तरुण स्वतःच्या पायावर उभारल्याचे पाहून मनाला खूप समाधान मिळते. शासकीय पगाराच्या नोकरीत एका वेगळ्या दिशेने जाऊन तरुणांना उभा केल्याचे समाधान आहे. विवेक मळगावकर (कुडावल, सिंधुदुर्ग) शेळीपालन आणि भाजीपाला निर्मिती केली. 

सांगली जिल्ह्यात झेडपी आणि सध्या जिल्हा मृद्‌संधारण अधिकारी म्हणून माती परीक्षणासह विविध शेतीच्या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मिळवून देतो आहे. विशेष म्हणजे माझ्या माहुली गावात 22 कृषी पदवीधर आणि पाच अधिकारी आहोत. त्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी वर्षातून स्वखर्चाने कार्यशाळा घेतो. वडिलांच्या स्मरणार्थ काही उपक्रम राबवतो. अर्थात शेती उत्पादनवाढीसाठीच्या प्रयत्नांना तरुणांची मिळणारे सहकार्य फार महत्त्वाचे आहे. शासकीय नोकऱ्यांत संधी मिळत नसल्याने आज शिक्षित तरुण मोठ्या संख्येने शेतीकडे वळतोय, ही जमेची बाजू आहे. अन्यथा गेल्या चार पिढ्या नोकरी न मिळाल्याने नाइलाज म्हणून शेतीकडे वळत होत्या. याला आता कुठे तरी छेद मिळतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com