जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता धोक्‍यात 

जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता धोक्‍यात 

कोल्हापूर - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, खासदार राजू शेट्टी यांनी भारतीय जनता पक्षाला दिलेला पाठिंबा काढून घेत सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यातील सत्तेवर काही फरक पडत नसला तरी कोल्हापूर जिल्हा परिषदेतील सत्तेवर मात्र त्याचा निश्‍चित फरक पडणार आहे. स्वाभिमानीच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील भारतीय जनता पक्षाची सत्ता मात्र धोक्‍यात आली आहे. महिला व बाल कल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे यांना आपल्या सभापतीपदाचा आता राजीनामा द्यावा लागणार असल्याने त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून राहिले आहे. 

गेल्या सहा महिन्यापासून सत्तेतून बाहेर पडण्याच्या धमक्‍या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी देत होते. त्यामुळे त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्यापुर्वी त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश दिला होता. मात्र खासदार शेट्टी यांच्या आदेशाला मंत्री खोत यांनी शिरोळमध्येच कृष्णा नदीचे पात्र दाखविले. त्यामुळे खासदार शेट्टी चांगलेच संतप्त झाले होते. सरकारमधून बाहेर पडण्याची भाषा अधिकच तीव्र झाली आणि अखेर आज त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाला फरक पडला नसला तरी स्थानिक पातळीवरील काही ठिकाणची समिकरणे बदलण्याची नव्हे तर भाजपला सत्ता गमाविण्याची वेळ येणार आहे, तशी परिस्थिती कोल्हापूर जिल्हा परिषदेत आली आहे. 

कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे दहा सदस्य निवडून आले एवढेच नव्हे तर त्यांनी जिल्हा परिषदेची सत्ता कॉंग्रेसकडून हिसकावून घेतली. आणि जिल्हा परिषदेत प्रथमच कमळ फुलविले. 

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. कॉंग्रेसला 14 जागा मिळाल्या तेवढ्याच जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या. राष्ट्रवादी कॉंग्रेसला 11 जागा मिळाल्या. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस दोघांनी एकत्र येऊन जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. शिवसेनेचे 9, आवाडे गट 2, ताराराणी आघाडी 3, युवक क्रांती आघाडी 2, जनसुराज्य शक्‍ती 6, शाहू विकास आघाडी 2 व एक अपक्ष अशी सदस्य संख्या आहे. त्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी सर्वांचा कस लागला होता. 

गेल्या पाच वर्षात स्वाभिमानी शेतकरी संघटना कॉंग्रेससोबत होती, त्यामुळे ती यावेळी देखील आपल्यासोबत राहिल असे कॉंग्रेसच्या नेत्यांना आशा होती, पण स्वाभिमानीचे नेते खासदार शेट्टी भारतीय जनता पक्षाच्या खूप प्रेमात पडल्याने तसे झाले नाही. त्यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांनी दिलेली ऑफर धुडकावून लावत भाजप आघाडीला पठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल. आणि एक सभापतीपद पदरात पाडून घेतले. यावेळी भारतीय जनता पक्षाने कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला बाजुला ठेवत सर्वांची मोठ बांधण्यात यश मिळविले. 

शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष 
जिल्हा परिषद सत्तेत भाजसोबत स्वाभिमानी आहे. खासदार शेट्टी यांनी आता सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भारतीय जनता पक्षाच्या जिवावर भोगत असलेले पदही त्यांना सोडावे लागणार आहे. परिणामी येथील सभापती शुभांगी शिंदे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. श्रीमती शिंदे यांना जर खासदार शेट्टींनी पदाचा राजीनामा देण्यास सांगितले तर त्या आपल्या पदाचा राजीनामा देणार की त्या देखील भाजपच्या गोटात सामील होणार हे लवकरच समजेल. 

संख्याबळ 
कॉंग्रेस : 14 
भाजप : 14 
राष्ट्रवादी : 11 
शिवसेना : 09 
जनसुराज्य शक्‍ती : 06 
आवाडे गट : 02 
ताराराणी आघाडी : 03 
युवक क्रांती आघाडी : 02 
शाहू विकास आघाडी : 02 
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 02 
अपक्ष : 1 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com