श्रीगोंदे - 'कुकडी'तून पिण्यासाठी नव्हे, तर फळबागांना पाणी द्यावे. त्याची सुरवात श्रीगोंदा तालुक्यातून करावी, या मागणीसाठी आमदार राहुल जगताप आक्रमक झाले असून, "कुकडी'च्या घारगाव येथील वितरिकेचे (क्रमांक 132) वेल्डिंग केलेले दार आज त्यांनी गॅस कटरच्या साह्याने शेतकऱ्यांसमक्ष तोडले.
फळबागांना पाणी देण्याच्या मागणीसाठी जगताप यांनी गॅस कटर घेऊन आंदोलन सुरू केले. शेतकऱ्यांसह घारगावच्या वितरिकेचे दार त्यांनी तोडले. नंतर "कुकडी' कालव्यातच शेतकऱ्यांची बैठक झाली. तीत जगताप यांच्या भूमिकेसोबत राहण्याची ग्वाही सर्वांनी दिली.
जगताप म्हणाले, 'कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पिण्यासाठी तीन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय झाला. फळबागा आणि विसापूरखालील शेतकरी हा विषय महत्त्वाचा असल्याचे आम्ही अगोदरच स्पष्ट केले होते. पण सरकारच्या प्रतिनिधींनी ऐकले नाही. त्यात काही "हितचिंतक' तालुक्याला पाणी मिळू नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत. पाणीप्रश्नावर आम्हाला राजकारण करायचे नाही. पाणी मिळवून देण्यासाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत.''
|