सोलापूर : राज्यात मागील दहा वर्षात लाचखोरी, उत्पन्नापेक्षा अधिक कमाई व अन्य भ्रष्टाचार प्रकरणांच्या तब्बल 7 हजार 119 कारवाया करण्यात आल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी पुन्हा वाढ झाली आहे. जानेवारी ते 3 जुलै 2018 या कालावधीत तब्बल 442 प्रकरणातील कारवायांमध्ये 600 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामध्ये महसूल, पोलीस, शिक्षण, पंचायत समिती व जिल्हा परिषद, महापालिका, महावितरण या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे.
विकास कामांपेक्षा आता भ्रष्टाचार, लाचखोरी, कमाईपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्यांच्या संख्येत महाराष्ट्र देशात अव्वल होण्याकडे वाटचाल करत आहे. सर्वसामान्यांची कायदेशीर व नियमानुसार कामे करण्याकरिता काही अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ठराविक रक्कम मागितली जाते. लाचलुचपत विभागाकडून करण्यात आलेल्या कारवायांमध्ये वर्ग 1 च्या तब्बल 81 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 2018 मध्ये केलेल्या कारवायांमध्ये मुख्यत: महसूल विभागातील 99, पोलीस प्रशासन 92, पंचायत समिती विभाग 50, महावितरणमध्ये 30, महापालिका प्रशासनातील 27 आणि शिक्षण विभागातील 16 प्रकरणांचा समावेश आहे. विभागातील लाचलुचपत कारवायांमध्ये सोलापूर राज्यात तिसऱ्या तर स्वतंत्र जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर पहिल्या क्रमांकावर आहे.
सर्वसामान्यांच्या परिस्थितीची जाण न ठेवता आपल्याच भाकरीवर डाळ ओढण्याची प्रवृत्ती आता महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उदयाला येत आहे. त्यामुळे आता 1064 या टोल फ्रि क्रमांकारवर तक्रार करा आणि भ्रष्टाचार थांबवा, असे लाचलुचपत विभागाचे पोलिस उपअधिक्षक अरुण देवकर यांनी स्पष्ट केले आहे.
आकडे
लाचखोरीची प्रकरणे
(2010-14)
3,435 प्रकरणे
(2015-18)
3,684 प्रकरणे
(2018)
विभागनिहाय कारवाया
पुणे : 100
नागपूर : 65
अमरावती : 61
औरंगाबाद : 54
मुंबई : 21
ठाणे : 53
नांदेड : 47
नाशिक : 41
एकूण : 442
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.