सोलापूर - कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ झाला आहे का, त्यांच्याच खात्यावर रक्कम जमा झाली आहे का, अचूक रक्कम दिली गेली आहे का, या बाबींच्या पडताळणीकरिता आता पुन्हा 1400 लेखापरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्यांना थेट शेतकऱ्यांच्या याद्या ऑनलाइन मिळणार आहेत.
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेतले. त्यानंतर विकास सोसायट्यांमधील सर्व शेतकऱ्यांच्या माहितीची पडताळणी करून त्याचा अहवाल तयार करण्यात आला. तालुकास्तरीय समित्यांकडून पात्र-अपात्र ठरविणे, असे टप्पे पार पाडले. तरीही बहुतांशी शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे; परंतु ज्या-ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची रक्कम मिळाली आहे, त्या शेतकऱ्याच्या खात्यावरून कशाप्रकारे व्यवहार झाले आहेत, त्याची पडताळणी केली जाणार आहे. त्यातून शेतकऱ्याने स्वत: संबंधित बॅंकेतून कर्ज काढले होते की नाही, याची खात्री होणार आहे.
कर्जमाफीच्या माध्यमातून ज्या-ज्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे, अशा शेतकऱ्यांची पडताळणी करण्यात येणार आहे. त्यासाठी लेखापरीक्षकांची स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली असून, लवकरच शेतकऱ्यांच्या खात्याची माहिती तपासण्यात येईल.
- एस. एस. संधू, अतिरिक्त मुख्य सचिव, सहकार विभाग
|