दक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत

दक्षिण-उत्तर' पेक्षा माळशिरसला जास्त पाऊस तरीही दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत

सोलापूर : जिल्ह्यातील आठ तालुक्‍यांचा दुष्काळी यादीत समावेश झाला आहे. उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर व बार्शी या तीन तालुक्‍यांना दुष्काळातून वगळले आहे. 30 सप्टेंबरअखेर माळशिरस तालुक्‍यात सरासरी 41.11 टक्के पाऊस पडला. याउलट 'उत्तर'मध्ये 37.60 तर 'दक्षिण'मध्ये 39.32 टक्के पाऊस पडला. माळशिरसपेक्षा या दोन्ही तालुक्‍यात कमी पाऊस पडूनही त्यांचा दुष्काळी तालुक्‍यात समावेश झालेला नाही.

शासनाने सात ऑक्‍टोबर 2017 ला दुष्काळ घोषित करण्याची कार्यपद्धती निश्‍चित केली. त्यानुसार पर्जन्यमान, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक व पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण विचारात घेतले जातात. बार्शी तालुक्‍यात सप्टेंबर अखेर सरासरी 59.16 टक्के पाऊस झाला आहे. त्या तालुक्‍याचाही समावेश दुष्काळी तालुक्‍याच्या यादीत केला नाही. दुष्काळ घोषित करण्याच्या नव्या कार्यपद्धतीमुळे हे तीन तालुके दुष्काळातून वगळले आहेत का? असाही प्रश्‍न शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे. जर पाऊसच कमी पडला असेल तर वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता निर्देशांक, जलविषयक निर्देशांक यांचा उपयोग तरी काय? असाही प्रश्‍न विचारला जात आहे. पाऊसच नाही म्हटल्यावर पिकांचे क्षेत्रीय सर्वेक्षण तरी काय करणार? पाऊस नसल्याने पिकेही आलेली नाहीत. त्यामुळे पर्जन्यमान वगळता अन्य कोणत्याही निर्देशकांचा काहीच उपयोग होत नाही. दुष्काळ पडण्यामागे केवळ पाऊस हे एकच कारण महत्त्वाचे असल्याचे शेतकरी सांगतात. एका तालुक्‍यात जास्त पाऊस झालेला असतानाही त्याचा समावेश दुष्काळी तालुक्‍यात होतो. कमी पाऊस झालेल्या तालुक्‍यांपेक्षा जास्त पाऊस झालेला तालुका जर दुष्काळी तालुक्‍यात येत असेल तर ट्रिगर दोन नेमके काय काम करते हेच कळत नाही. कमी पाऊस असूनही दुष्काळ नाही आणि जास्त पाऊस असूनही दुष्काळ हे स्थिती ट्रिगर दोनमुळे निर्माण झाल्याचेही सांगितले जाते.

पूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करावा 

जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांचे तालुके दुष्काळातून वगळले आहे. उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्‍यात माळशिरसपेक्षा कमी पाऊस पडूनही त्यांना वगळले आहे. मंत्र्यांचे तालुके म्हणून वगळले का? असाही प्रश्‍न विचारला जात आहे. काहीही झाले तरी जिल्ह्यात सरासरी 38.39 टक्के पाऊस झाला असल्याने पूर्ण जिल्हाच दुष्काळी जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com