सांगली : लोक रसाळ द्राक्षे कधी बाजारात येतात, याची प्रतीक्षा करत असताना फळांचा राजा आंबा चक्क डिसेंबर महिन्यात बाजारात आला आहे. तमिळनाडूतील प्रयोगशील शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच धाडसी प्रयोग करत बिगरहंगामी आंबा पिकवला आहे. तो स्वस्त आणि मस्त आहे.
गेल्या चार दिवसांपासून तमिळनाडूतून रोज सरासरी दोन ते तीन टन याप्रमाणे आंब्याची आवक झाली आहे. त्यात तोतापुरी आंब्याचे प्रमाण जास्त असून, तो 50 ते 70 रुपये किलो दराने विकला जातोय. हापूस आंबा केवळ 200 किलो आला होता, तो 350 रुपये किलोने विकला गेला.
लालबाग 200 किलो आवक होती, तो 100 रुपये किलोने विकला. एरवी एप्रिलच्या मध्यावर आंब्याची आवक सुरू होते. रसाळ द्राक्षांतून थोडी उसंत घेऊन लोक आंब्यावर ताव मारायला तयार होतात; परंतु यंदा चित्र पालटले आहे. द्राक्षाआधी आंबा बाजारात आला आहे.
|