बोंडअळीच्या भरपाईसाठी आ. राजळेंनी वेधले मुख्यमंत्र्यांचे लक्ष 

Monika-Rajale
Monika-Rajale

तिसगाव (नगर) : बोंडअळीमुळे ओढवलेल्या नुकसानीचा अहमदनगर जिल्ह्याचा अंतिम अहवाल राज्य शासनाकडे पाठवण्यात अाला अाहे. यामध्ये शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातील दोन्ही तालुक्यातील एकाही गावांचा त्यात समावेश करण्यात आला नव्हता. ही बाब लक्षात येताच आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांचे लक्ष वेधून मतदारसंघातील बोंड अळीने बाधित झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची आग्रही केली.

या बोंडअळीमुळे शेवगाव तालुक्यातील ५७ हजार ५०५ शेतकऱ्यांच्या सुमारे ४७ हजार १९३ हेक्टर तर पाथर्डी तालुक्यातील ४७ हजार १९२ शेतकऱ्यांच्या सुमारे ३६ हजार १३१ हेक्टर क्षेत्रावरील कपाशी पिकांचे नुकसान झाले होते. या बोंडअळीमुळे ओढवलेल्या नुकसानीचे पंचनामे शासकीय यंत्रणेकडून पूर्ण करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यात या दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे सर्वाधिक नुकसान झाले होते.

शेवगाव व पाथर्डी हे दोन्ही तालुके दुष्काळग्रस्त म्हणून ओळखले जातात. या भागात नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणावर कपाशीची लागवड होत असते. याही वर्षी मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी कपाशी बियाणाची लागवड केली परंतु ऐन उत्पादनाच्या वेळी या बोंडअळीमुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक नियोजन कोलमडले. त्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची नितांत गरज असल्याचे आमदार राजळे यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिले. सदर मागणी महसूलमंत्री तसेच कृषिमंत्री यांचेकडेही लावून धरली. प्राप्त परिस्थिती लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी गुलाबी बोंडअळीमुळे देण्यात येणाऱ्या भरपाईसाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्यांतील आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांचा गांभीर्याने प्राधान्यपुर्वक विचार करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com