पडक्‍या विहिरींमुळे वन्यप्राणी असुरक्षित

Tiger
Tiger

पाटण - सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या अखत्यारीत एका महिन्यामध्ये बिबट्या पाण्याची विहीर किंवा रिकाम्या टाकीमध्ये पडण्याच्या तीन घटना घडल्या. दोन प्रसंगात सुखरूप सुटका, तर एका घटनेत बिबट्याचा मृत्यू झाला. या घटनांचा विचार करता वन्यप्राण्यांचे जीवन रिकाम्या पाण्याच्या टाक्‍या, पडक्‍या विहिरींमुळे असुरक्षित झाले आहे असे वाटते. या कारणांचा बंदोबस्त सह्याद्री व्याघ्र प्रकल्प करणार आहे का?

डिसेंबर महिन्यात वनकुसवडे पठारावर तीन अस्वलांचा शेतकऱ्यांवर हल्ला, उरूल घाटात दोन बिबट्यांचे भरदिवसा दर्शन अशा घटना घडल्या. २४ जानेवारी रोजी मांजराचा पाठलाग करत रासाटी गावच्या हद्दीत एका पडक्‍या; परंतु पाणी असणाऱ्या विहिरीत बिबट्या पडला. डोक्‍याला व तोंडाला मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. २२ फेब्रुवारीला रिकाम्या पाण्याच्या टाकीत बिबट्याचा बछडा पडला मात्र टाकीत पाणी नव्हते अन्यथा त्याचाही मृत्यू झाला असता. आणखी धक्कादायक बाब म्हणजे सहा दिवसांपूर्वी १६ फेब्रुवारीला त्याच टाकीत दुसरा बिबट्याचा बछडा पडला होता. वन्यजीव विभागाने त्यालाही सुखरूप बाहेर काढल्याने तोही बाहेर काढताच रासाटी वन विभागाच्या जंगलात सुखरूप पोचला. एका महिन्यामध्ये तीन घटना रासाटी गावच्या हद्दीत घडुनही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे प्रशासन दक्षता घेत नाही हा चिंतेचा विषय आहे.

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीमध्ये रिकाम्या मात्र पाणी नसणाऱ्या विहिरी, संरक्षण कठडे नसणाऱ्या व पाणी असणाऱ्या विहिरी व नळ पाणीपुरवठा योजनांच्या व खासगी मालकीच्या रिकाम्या अथवा पाणी असणाऱ्या टाक्‍यांचा सर्व्हे करण्याची गरज असून, त्याच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. नाहीतर घटना घडल्यानंतर सापळ्यासह लवाजमा घेऊन जाणाऱ्या वन्यजीवच्या नेहमीच्या सवयीने दुर्मिळ प्राण्यांचे अस्तित्व धोक्‍यात येईल. स्थानिक नागरिकांनी स्वतःचा जीव धोक्‍यात घालून दोन बिबट्यांना जीवदान दिले. व्याघ्र प्रकल्पाने अस्तित्व धोक्‍यात आलेला हा विभाग अशा प्रसंगात प्राण्यांच्या बाबतीत अन्याय होऊ देत नाही हे दोन प्रसंग शिकवितात. त्यामुळे शासनाने ही योग्य निर्णय घेऊन धोकादायक ठिकाणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जनतेमधून होत आहे.

वन्यप्राण्यांच्या दहशतीचाही अनुभव घ्या
सिमेंटच्या जंगलात राहून वन्यप्राण्यांवर प्रेम करणारे अनेक पर्यावरण व वन्यप्रेमी तालुक्‍यात फिरताना दिसतात. वन्यप्राणी सापडला की फोटोसेशनची हौस भागविण्यासाठी पाटणकडे धाव घेणारे वनकुसवडे पठारावरील अस्वल हल्ल्यातील जखमी हणमंत मिसाळ यांची साधी विचारपूस करण्याची माणुसकी दाखवत नाहीत. सोयीने आपली भूमिका बदलणाऱ्या या वन्यप्रेमींनी सिमेंटच्या जंगलात राहून प्रेमाचा पुळका आणण्यापेक्षा प्रत्यक्ष दुर्गम भागात येऊन वन्यप्राण्यांची दहशत काय असते याचा अनुभव घ्यावा, अशी चर्चाही सुरू झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com