राळेगणसिद्धी - भविष्यात सरकार कोणाचेही असो; आंदोलन केले की सरकारने मागण्या मान्य कराव्यात, यासाठी कार्यकर्त्यांचा दबावगट तयार करावा लागणार आहे. दिल्ली येथे होणाऱ्या आंदोलनातूनही कार्यकर्ते व जनतेचा दबावगट तयार व्हावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी येथे व्यक्त केली.
शेतीप्रश्नांसह विविध मागण्यांसाठी हजारे येत्या 23 रोजी दिल्लीमध्ये आंदोलन करणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राळेगणसिद्धी येथे राज्यस्तरीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर झाले. त्यात हजारे बोलत होते. समन्वय समिती सदस्य कल्पना इनामदार व शिवाजी खेडकर, सरपंच रोहिणी गाजरे आदी उपस्थित होते.
हजारे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "अच्छे दिन'चे आश्वासन दिले; मात्र "बुरे दिन' आले आहेत. तसेच, लोकपाल व लोकायुक्त कायदा देशात लागू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते; मात्र सत्तेत आल्यावर ते तसे वागले नाहीत. भ्रष्टाचार कमी होण्यासाठी देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त कायद्याची तत्काळ अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. तसेच, निवडणूक कायद्यात सुधारणा करावी, यांसह इतर काही मागण्यांसाठी आपण हे आंदोलन करीत आहोत.''
दिल्लीला न येणऱ्या कार्यकर्त्यांनी गाव, तालुका व राज्यपातळीवर अहिंसात्मक पद्धतीने आंदोलन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
|