बिबट्या पाहुण्याची आता धास्ती नको! 

बिबट्या पाहुण्याची आता धास्ती नको! 

सातारा - गर्दी-गोंगाट, त्यातून वन्यजिवांना होणारा त्रास व त्याचे मानवाला सोसावे लागणारे परिणाम हे सर्व लोकजागृतीच्या माध्यमातून थोपवण्यासाठी आज शाहूपुरीत स्थानिकांच्या पुढाकाराने वन्यजीव आपत्कालीन सुरक्षा पथक स्थापण्यात आले. "सकाळ'ने केलेल्या आवाहनास शाहूपुरीवासीयांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने हे शक्‍य झाले. सातारा जिल्ह्यातच नव्हे, तर कोल्हापूर वन विभागामध्ये बिबट्या प्रवणक्षेत्रात अशा पद्धतीने स्थापन होणारे हे पहिलेच पथक आहे. 

शाहूपुरीत आंबेदरे रस्त्यावर दोन दिवसांपासून बिबट्याचा रहिवास होता. अशा आपत्कालीन परिस्थितीत माणसाचे वर्तन कसे असावे, याबाबत समाजमनात मोठे अज्ञान असल्याने बघ्यांच्या झुंडीच्या झुंडी शाहूपुरीत बिबट्याला बघण्यासाठी रस्तोरस्ती दिसत होत्या. इमारतीची गच्ची, घरांचे छत, झाडावर, जागा मिळेल तेथे लोक बिबट्या पाहण्यासाठी दबा धरून बसत होते. जमावाच्या वेढ्यातून स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात त्याला जमावाला सामोरे जावे लागले. त्यामुळे झालेल्या गलबल्यामुळे तो बिथरला आणि दोघा-तिघांच्या अंगावर ओरखडे काढून गेला. वन्यजीव मानवी वस्तीत शिरल्यानंतर आपले वर्तन कसे असावे, याची जाण आणि भान ठेवले तर वन्यजीव- मानव संघर्ष टाळता येऊ शकतो. 

"सकाळ'ने गुरुवारच्या अंकात "शेकडोंनी घेरता आणि दहशत बिबट्याची म्हणता...!' या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. यामध्ये अशा वन्यजीव आपत्कालीन परिस्थितीत जमावाच्या मानसिकतेला हाताळण्यासाठी स्थानिक लोकांचे एक दक्षता पथक स्थापून या स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्याची गरज व्यक्त केली आहे. वनाधिकाऱ्यांसह सर्वांनाच ही संकल्पना आवडली. 

शाहूपुरीचे माजी सरपंच भारत भोसले, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र मोहिते, नवनाथ जाधव, सुहास वहाळकर, राजेंद्र केंडे, जनार्दन बाबर, संकेत परामणे, सचिन भोसले, अजय भोसले, किरण बोतालजी, प्रवीण चव्हाण, रजपूत आदींनी आज सकाळी "वन भवनात' उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांची भेट घेतली. वन्यजीव व नागरिक यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी स्वयंसेवी पद्धतीने काम करण्याची तयारी त्यांनी दर्शविली. तसे पत्र श्री. भोसले यांनी श्री. अंजनकर यांना दिले. त्यांनी तत्काळ या प्रस्तावास तत्त्वत: मान्यता दिली. यावेळी सहायक वनसंरक्षक तानाजी गायकवाड, व्ही. व्ही. परळकर, वनक्षेत्रपाल महेश पाटील, मानद वन्यजीवरक्षक सुनील भोईटे आदी उपस्थित होते. या पथकातील सदस्यांना वन्यजिवाच्या आपत्कालीन परिस्थितीत कोणती काळजी घ्यावी, काय करावे, काय टाळावे, जमावाला कसे हाताळावे, खबरदारीच्या उपाययोजना आदींचे प्रशिक्षण लवकरच देण्याचे यावेळी ठरले. 

कोल्हापूर विभागात पहिलाच प्रयोग 
""मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यासाठी वन विभाग विविध उपाययोजना करत असते; तथापि स्थानिक लोकांचा पुढाकार आणि सहभाग यातून कोल्हापूर वन विभागात प्रथमच अशा पद्धतीचे पथक साताऱ्यात तयार होत आहे. जिल्ह्यातील इतर बिबट्या प्रवणक्षेत्रात अशी पथके तयार करण्यात येतील,'' अशी माहिती उपवनसंरक्षक अनिल अंजनकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com