खाण माफियांकडून डोंगराची बेसुमार लूट 

खाण माफियांकडून डोंगराची बेसुमार लूट 

कऱ्हाड - मुदत संपली आहे, उत्खनन बंद करा, अशा लेखी व तोंडी सूचना तहसीलदार कार्यालयाकडून वारंवार देऊनही त्याला न जुमानता किमान सहा महिन्यांपासून नांदलापूर येथील खाणीमध्ये अवैध उत्खनन सुरू होते. ऐतिहासिक वारसा असलेला डोंगर खाण माफियांनी उत्खनन करून पोखरून काढला. राजकीय वरदहस्त असलेले उत्खनन माफियांनी राजकीय दबाव आणत येथील शासकीय यंत्रणेलाही धाकात ठेवले होते. मोठ्या राजकीय वरदहस्ताने सुरू असलेले अवैध उत्खनन करणाऱ्या सुमारे अकरापेक्षा जास्त खाणी काल सील करण्यात आल्या. अत्यंत धाडसी पाऊल उचलत महसूल विभागाने कारवाई केली. मात्र, मुदत संपल्यानंतरही झालेल्या अवैध उत्खनन, त्याला जबाबदार असलेल्यांवर शासकीय पातळीवर नेमकी काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागून आहे. 

नांदलापूर येथे कारवाई झालेल्या 11 खाणींना सहा महिन्यांसाठी उत्खनन परवाना मिळाला होता. मात्र, परवाना संपूनही त्यांनी उत्खनन सुरूच ठेवले होते. मात्र, काल सील केल्यामुळे त्यांचे ते उत्खनन बंद पाडले. तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली काल दिवसभर ही कारवाई सुरू होती. त्यात विलास शिर्के, धोंडिराम जाधव, मनोजकुमार जाधव, राजाराम कदम, सचिन शिर्के, पांडुरंग देशमुख, वसंत देशमुख, सतीश थोरात, अशोक जाधव यांच्या प्रत्येकी एक तर दत्तात्रय देसाई यांच्या दोन खाणींचा समावेश आहे. राजकीय वरदहस्त मोठा असल्यामुळे खाण माफियांनी राजकीय यंत्रणेलाच वेठीस धरून उत्खनन सुरू ठेवल्याची वस्तुस्थिती समोर येऊ लागली आहे. राजकीय दबाव आणून सुरू असलेले उत्खनन तहसीलदारांनी बंद केले. मात्र, त्या संबंधित खाण माफियांचे परवान्यांची मुदत होती फक्त सहा महिन्यांची. त्यानंतर त्यांनी मुदत संपूनही किती दिवस उत्खनन सुरू ठेवले, याची तांत्रिक माहिती घेऊन उत्खनन मुदत संपून जितके दिवस अधिक त्यांनी उत्खनन केले आहे, त्या कालवधीत त्या खाण माफियांकडून प्रत्येक दिवसाचा दंड घेण्याची मागणी होत आहे. 

वास्तविक ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या आगाशिव डोंगराला लागूनच होणारे उत्खनन त्या गडाला अत्यंत धोकादायक आहे. तेथे असलेल्या  बौध्दकालीन लेण्यांनाही त्याचा धोका आहे. त्याबाबत मीराताई आंबेडकर यांनीही वारंवार आंदोलनाचा इशारा दिला आहे. तेवढ्यापुरती तेथे बंदी आणली जाते. पुन्हा खाण माफियांकडून राजकीय दबाव आणून परवानग्या घेतल्या जातात व पुन्हा उत्खननाचा खेळ सुरू होतो. उत्खनन करण्यासाठी लोक त्या गडावर सुरूंग लावतात. भल्या पहाटे किंवा सकाळी सातच्या सुमारास तो सुरूंग लावला जातो. त्या सुरूंगाने त्या भागातील डोंगर कपारी तर हादरून जातेच, त्याशिवाय त्या भागातील वन्य प्राणी व पक्ष्यांवरही त्याचा परिणाम होतो. तेथील नागरिकांनाही त्या सुरूगांचा त्रास सहन करावा लागतो आहे. उत्खनन करणारे या कोणाचीही परवा न करता त्यांचे काम सुरू करतात, यावरही नियंत्रण येण्याची गरज आहे. नांदलापूर येथे 17 दगडाच्या खाणी आहेत. त्यातील 11 दगडाच्या खाणींना उत्खननासाठी सहा महिन्यांची मुदत होती. या खाणींची मुदत केव्हा संपली होती. त्यांचे त्यांनी नूतनीकरण का केले नाही, कोणाच्या वरदहस्ताने त्या खाणीतून उत्खनन सुरू होते, या सगळ्याच गोष्टींची खुलासेवार चौकशी होऊन तेथील खाणींचे उत्खनन कायमस्वरूपी बंद व्हावे, यासाठी तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. 

खाण माफियांचाच दबाव  
सहा महिन्यांच्या मुदतीने 11 खाणींना परवानगी होती. त्या खाणींची मुदत संपल्याचे संबंधितांना कळवण्यात आले होते. तोंडी व लेखीही सूचना दिल्या होत्या. त्या सगळ्या नोटिसांना त्यांनी केराची टोपली दाखवली होती. राजकीय वरदहस्त असल्याने खाण माफियांनी त्यांचे उत्खनन सुरू ठेवले होते. त्या खाण माफियांचे राजकीय वजन मोठे आहे, तोच राजकीय दबाव आणून महसूल यंत्रणाही गप्प केली होती. त्यामुळेच मुदत संपूनही त्यांचे उत्खनन सुरू होते. पर्यावरणप्रेमींनी आवाज उठवल्यानंतर त्यावर कारवाई झाली. त्यामुळे आता त्या खाणी कायमस्वरूपी बंद व्हाव्यात, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com