सोलापूर - "अंगापेक्षा भोंगा मोठा', "ऋण काढून सण', या म्हणींप्रमाणे सध्या बाजार समित्यांच्या निवडणुकीची परिस्थिती झाली आहे.
शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार दिल्यानंतर राज्यातील पहिल्या टप्प्यात 52 बाजार समित्यांच्या निवडणुका होत आहेत. मात्र, त्यापैकी 17 बाजार समित्यांनी निवडणुकीचा खर्च करू शकत नसल्याचे पत्र सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिली आहेत. त्यामुळे या बाजार समित्यांना निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
गोंदिया, गडचिरोली, नागपूर जिल्ह्यातील कामठी, नरखेड, कळमेश्वर, हिंगणा व काटोल, यवतमाळमधील बोरी अरब, दारव्हा, बुलढाण्यातील मोताळा, सिंदखेड राजा, उस्मानाबादमधील परांडा, परभणीतील जिंतूर, बोरी, नंदुरबारमधील धडगाव, अक्कलकुवा आणि सोलापूरमधील करमाळा या बाजार समित्यांनी निवडणुकीचा खर्च करण्याची स्थिती नसल्याचे पत्रे दिली आहेत. तसेच गोंदिया, चंद्रपूरमधील पोंभूर्णी, सावली, परभणीतील जिंतूर आणि मुंबई व कल्याण बाजार समित्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. काही बाजार समित्यांमध्ये उलाढाल (उत्पन्न) कमी आणि मतदार अधिक अशी स्थिती झाली आहे. या निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप आले आहे.
उत्पन्नापेक्षा निवडणुकीचा खर्च अधिक होणार असल्याने तो आम्ही देऊ शकत नाही, असे पत्र पहिल्या टप्प्यात निवडणुका होणाऱ्या 17 बाजार समित्यांनी सहकार निवडणूक प्राधिकरणाला दिली आहेत. त्याची माहिती शासनाला कळविली आहे.
- यशवंत गिरी, सचिव, सहकार निवडणूक प्राधिकरण
आकडे बोलतात
राज्यातील बाजार समित्या - 306
पहिल्या टप्प्यात निवडणुका - 48 बाजार समित्या
अंदाजित शेतकरी मतदार - 37.23 लाख
एका मतदारासाठीचा खर्च - 110 रुपये
एकूण निवडणुकीचा खर्च - 40.95 कोटी
|