सोलापूर - सध्या सुरू असलेल्या बाजार समित्यांसाठी दहा कोटींचा खर्च अपेक्षित आहे. बाजार समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रत्येक मतदारापोटी तीनशे ते चारशे रुपये खर्च होणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे, तर प्रतिमतदार 25 रुपये खर्च प्रस्तावित करावा, असा प्रस्ताव सहकार प्राधिकरणातर्फे शासनाला पाठविण्यात येणार आहे. उत्पन्नापेक्षा निवडणुकीचा खर्च अधिक असल्याने काही बाजार समित्यांनी निवडणूक खर्चासाठी नकार दिला आहे.
सोलापूरसह राज्यातील 51 बाजार समित्यांची सध्या रणधुमाळी सुरू आहे. त्यामध्ये ठाण्यातील मुंबई, कल्याण, नाशिक जिल्ह्यातील सटाणा, नामपूर, नंदूरबारमधील अक्कलकुवा, शहादा, धडगाव, पुण्यातील पुणे, सोलापुरातील सोलापूर, बार्शी, करमाळा, औरंगाबादमधील खुलताबाद, सोयगाव, परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, हिंगोलीतील कळमनुरी, आखाडा बाळापूर, लातूरमधील औसा, अहमदपूर, देवणी, उस्मानाबादमधील परांडा, बीडमधील पाटोदा, नांदेडमधील देगलूर, मुदखेड, हदगाव, हिमायतनगर, इस्लामपूर, कुडलवाडी, कंधार, हणेगाव, बिलोली, धर्माबाद, कुंटूर, बुलडाण्यातील मोताळा, मलकापूर, सिंधखेड राजा, यवतमाळमधील पांढरकवडा, दारव्हा, पुसद, उमरखेड, बोरी अरब, नागपुरातील कारोल, हिंगणा, कळमेश्वर, नरखेड, नागपूर, कामाठी, तर चंद्रपूरमधील पोंभुर्णी, सावली, तसेच गोंदिया आणि गडचिरोली या 51 बाजार समित्यांचा समावेश आहे.
आकडे बोलतात...
निवडणूक - 51 बाजार समित्या
अंदाजित मतदार - 39,46,719
प्रतिमतदार खर्च - 25 रुपये
एकूण खर्च - 9,86,67,975
|