नगर - 'कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच नेत्यांनी काम केले पाहिजे. स्वार्थासाठी पक्ष अडचणीत येईल, असे राजकारण करू नका. इथे नातीगोती फार अडचणीची आहेत. त्यामुळे नात्यागोत्यांचे "फिक्सिंग' अजिबात खपवून घेतले जाणार नाही,'' असा सज्जड दम राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पवार बोलत होते. ते म्हणाले, 'शेतकरी आणि कामगार आपला अजेंडा आहे. चांगले काम करणाऱ्याला संघटनेत ठेवा. काही जण नुसते "लेटरहेड'वर नावे छापतात आणि पक्षसंघटन शून्य. व्यक्ती नसून पक्ष श्रेष्ठ आहे. काही कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेऊन येतात. आमच्याबरोबर फोटो काढतात आणि दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर "व्हायरल' करतात. हे चालणार नाही.''
पवार म्हणाले, 'अडचणींना सामोरे जा. त्यातूनच कार्यकर्ता तयार होतो. गावागावात संघटना बांधा. पक्षसंघटन कोणा एकाचे काम नाही; ती सामूहिक जबाबदारी आहे.''
|