नगर - ऊसदर निश्चित करण्यासाठी शेतकरी सुकाणू समिती आणि कारखानदार यांची आज दुपारी मुंबईत सहकारमंत्री सुभाष देशमुख व विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेली बैठक फिसकटली. कारखानदारांचा निषेध करून सुकाणू समिती आता चार डिसेंबरपासून उपोषणाचा मार्ग अवलंबणार आहे.
ऊसदरावरून शेवगाव येथे आंदोलन झाले होते. त्यामध्ये झालेल्या गोळीबारात दोन शेतकरी जखमी झाले होते. हे प्रकरण राज्यभर गाजले. सरकारने एफआरपी निश्चित केलेला असल्याने त्यापेक्षा अधिक रक्कम देण्याचा अधिकार कारखानदारांचा आहे. या पार्श्वभूमीवर भविष्यात गळीत शांततेत व्हावे, म्हणून आज ही बैठक घेण्यात आली. बैठकीस शेतकरी सुकाणू समितीचे अध्यक्ष डॉ. अजित नवले, अजय महाराज बारस्कर, बाळासाहेब पठारे यांच्यासह साखर आयुक्त संभाजी कडू पाटील आदी 17 कारखान्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
चर्चेमध्ये कारखानदारांनी पहिली उचल म्हणून एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्याची तयारी दर्शविली. तसेच, ऊस नियामक मंडळाकडून 70ः30 नुसार जो दर निश्चित होईल, तो फरकही देण्यात येणार असल्याचे सांगितले. मात्र, शेतकरी संघटनेने पहिली उचल तीन हजार पाचशे रुपये देण्याचा आग्रह धरला. कारखानदारांनी एवढा दर देण्यास असमर्थता दर्शविली. कारखान्यांच्या अडचणी, आर्थिक अडचणी याबाबत कारखानदारांनी भूमिका मांडून एफआरपी अधिक दोनशे रुपये देण्यास सहमती दर्शविली. शेतकरी संघटना मात्र आपल्या मागणीवर ठाम राहिली, त्यामुळे कोणताही निर्णय न होता ही बैठक फिसकटली. उद्या (शुक्रवार) या संदर्भात बैठक घेण्यात येणार आहे.
नगरमध्ये 30 रोजी बैठक
बैठक फिसकटल्यामुळे शेतकरी सुकाणू समिती गुरुवारी (ता. 30) नगरमध्ये बैठक घेणार असून, शेतकऱ्यांना बैठकीतील वृत्तांत सांगणार आहे. तसेच, या निषेधार्थ चार डिसेंबरपासून लोणी (ता. राहाता) येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करण्यात येणार आहे. कारखानदारांनी देऊ केलेला दर मान्य नसलेल्या शेतकऱ्यांनी या उपोषणात सहभागी होण्याचे आवाहनही डॉ. नवले यांनी केले आहे.
|