सांगली : "शेतकऱ्याचा नेता म्हणून ह्यो मंत्री झाला अन् आता शेतकऱ्यांच्या जिल्हा बॅंकांना पैसे देऊ नका म्हणतोय. ह्याला पिठाची गिरणी चालवायला आली नाही, जिल्हा बॅंकेच्या कारभारावर बोलायची अक्कल हाय का? सदू, तू गावाकडं ये, उसानं फोकाळतो," अशा शब्दांत जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे अध्यक्ष, राष्ट्रवादीचे नेते दिलीप पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आज हल्लाबोल केला.
रिझर्व्ह बॅंकेने जिल्हा बॅंकांतून आर्थिक व्यवहारांवर निर्बंध आणल्याच्या निषेधार्थ जिल्हा बॅंकेसह विकास संस्था, पतसंस्था व अन्य सहकारी संस्था प्रतिनिधी, सभासद, कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्याचे नेतृत्व दिलीप पाटील यांनी केला. सदाभाऊ खोत यांनी पुण्यात "जिल्हा बॅंकांचा कारभार लुटीचा असून त्यांना पैसे देऊ नका', असे वक्तव्य केले होते. त्याचा पाटील यांनी खरपूस समाचार घेतला. वाळवा तालुक्यात हे दोन नेते कट्टर विरोधी पक्षाचे प्रतिनिधी असले तरी एकमेकांचे खासम्खास मित्रही आहेत.
पाटील म्हणाले, "जिल्हा बॅंक नसती तर ह्या सदूची सोसायटी कुठून आली असती. ह्याला ग म कळत नाही. कर्ज कळत नाही. आथा तर मंत्री झालाय. ह्याला एटीएमच्या रांगेत थांबायला लागत नाही. ह्याला गाडी फुकट, जेवन फुकटं, सारी ऐषाराम फुकट हाय. मंत्री झाल्यामुळे लोक आहेर आणत्यात, त्यामुळे ह्याला कपडंबी आता फुकटातच मिळत्यात. त्यामुळे ह्याला सत्तेची मस्ती आल्या. मुख्यमंत्री म्हणाले, शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून सदाभाऊला मंत्री केलं... थोतांड आहे. आता ये म्हणावं इतकं, विकास सोसायटीवालं धोपटून काढतील.''
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.