सदाभाऊंची आता आवश्‍यकता नाही - राजू शेट्टी

सदाभाऊंची आता आवश्‍यकता नाही - राजू शेट्टी

गडहिंग्लज - सदाभाऊ सरकारमध्ये असल्याने ते सरकारचे धोरण मांडत आहेत. आम्ही चळवळीत असल्याने आमची रस्त्यावरची लढाई सुरू आहे. सदाभाऊंची आता आवश्‍यकता वाटत नाही. चळवळीसाठी मी अजून समर्थ आहे, अशा शब्दांत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर शरसंधान साधले; मात्र चळवळीला गरज वाटेल तेव्हा सदाभाऊ सोबत येतील, हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. 

"स्वाभिमानी'तर्फे शेतकरी कर्जमुक्ती दुचाकी रॅली गडहिंग्लजला आली होती. या वेळी शेट्टी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शेतकऱ्यांसाठी आमची सरकारविरोधी लढाई सुरू असली, तरी सदाभाऊंचा मंत्रिपदाचा राजीनामा मागणार नाही. या पदासाठी त्यांचे नाव कार्यकारिणीने निश्‍चित केले होते. त्यामुळे सदाभाऊंबाबतचा निर्णय कार्यकारिणीच घेईल, असेही त्यांनी सांगितले. 

शेट्टी म्हणाले, ""विरोधी पक्ष नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूला असतात, ही चांगली गोष्ट आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी पक्ष इतकी वर्षे सत्तेत होते. आज तेही शेतकऱ्यांसाठी संघर्ष यात्रा काढत आहेत. त्यांनी अजून थोड्या ताकदीने संघर्ष करावा. सर्वांनी हातभार लावला तर शेतकऱ्यांचा सातबारा लवकर कोरा होईल. आजवर शेतकऱ्यांचा गैरफायदा घेण्यात आला. खुर्चीवर कोण आहेत, याच्याशी आमचे देणे-घेणे नाही. आमची लढाई सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात आहे.'' 

विरोधी पक्षात असताना कोणत्याही प्रश्‍नावर अवास्तव मागण्या केल्या जातात; मात्र सत्तेत गेल्यानंतर त्या प्रश्‍नांचा पाठपुरावा करताना अडचणी दिसतात. त्यामुळेच विरोधी लोक सत्तेत गेले तरी प्रश्‍न शिल्लक राहिल्याचे दिसते. यातून पंतप्रधान नरेंद्र मोदीही सुटलेले नाहीत. 
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com