पंढरपूरः तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी काळजी घेण्याची गरज

pandharpur
pandharpur

पंढरपूर ः मुंबई येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर राज्यात एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी दुर्घटना होण्याची वाट न पहाता तेथील अत्यावश्‍यक सुधारणांसाठी निधी दिला पाहिजे. पंढरपूरसाठी "यशदा" ने तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन अहवाल गेल्या आठ वर्षांपासून शासन दरबारी धूळखात पडून आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

राज्यात पंढरपूरसह अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी यात्रा आणि उत्सवाच्या काळात लाखोंच्या संख्येने भाविक गोळा होतात. दिवसेंदिवस अशा धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणची गर्दी वाढत चाललेली आहे. त्यामुळे अशा ठिकाणच्या सुविधा तोकड्या पडत आहेत. काही ठिकाणचे नदी वरचे घाट धोकादायक झाले आहेत तर काही गावातील मंदिरा कडे जाणारे रस्ते अरुंद आहेत. राज्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणचे संभाव्य अपघात रोखण्यासाठी आवश्‍यक कामांची माहिती गोळा करुन जिथे दुर्घटनेचा जास्ती धोका आहे तेथील कामांसाठी निधी देण्याची गरज आहे.

यात्रांच्या वेळी लाखो वारकरी पंढरपूरला येत असतात. चंद्रभागा नदीच्या घाटांवर एकाच वेळी हजारो वारकऱ्यांची गर्दी होते. अनेकवेळा तिथे चेंगराचेंगरी सदृश्‍यस्थिती निर्माण होते. दोन वर्षापूर्वी चंद्रभागा घाटावर चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी काही भाविक देखील जखमी झाले होते. परंतु सुदैवाने जीवीतहानी झाली नव्हती. दरवर्षी गर्दी वाढत असल्याने शासनाने या विषयाकडे गांभिर्याने पाहून आवश्‍यक पावले उचलण्याची गरज आहे.

यात्रेत नगरपालिकेने इशारा दिलेला असताना देखील शेकडो वारकरी काही धोकादायक इमारतीत दाटीवाटीने राहतात. शहरात काही वर्षांपूर्वी लहानमोठ्या दुर्घटना घडलेल्या आहेत. भविष्यात अशा घटना घडू नयेत किंवा दुर्दैवाने एखादी घटना घडलीच तर गोंधळ न उडता तातडीने मदत पोचावी या विचाराने आठ वर्षापूर्वी पालिकेचे त्यावेळचे सत्ताधारी आघाडीचे मार्गदर्शक व सध्याचे आमदार प्रशांत परिचारक, तत्कालीन नगराध्यक्ष सतीश मुळे, तत्कालीन मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी पुढाकार घेऊन आपत्कालीन व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे काम "यशदा"कडे सोपवले होते. राज्यातील एखाद्या तिर्थक्षेत्रासाठी बनविण्यात आलेला हा पहिलाच आराखडा होता.

शासनाने या अहवालाची दखल घेऊन आवश्‍यक उपाययोजना करणे आवश्‍यक होते. परंतु, अहवाल तयार करुन अनेक आषाढी आणि कार्तिकी यात्रा होऊन गेल्या तरी प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. हा आराखडा शासनाकडे धूळ खात पडून आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून विविध विभागाकडील सद्यस्थिती नोंदवून शासनाकडे पाठपुरावा व्हायला हवा. परंतु अजून अंमलबजावणीच्या दृष्टीने प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली दिसत नाहीत.

पंढरीतील दुर्घटनांच्या नोंदी

  • पंढरपुरात 1985 साली चंद्रभागा नदीत होडी बुडून 17 वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
  • पंढरपूरला 1990 साली आषाढी यात्रा काळात गोपाळपूर पूलावर दुर्घटना घडून 9 वारकऱ्यांचा मृत्यू झाला होता.
  • यात्राकाळात दोन वेळा घरे पडून 5 ते 6 वारकऱ्यांचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com