गहिनीनाथगड (ता. पाटोदे) - 'संतांनी वैराग्याची आणि नेत्यांनी पराक्रमाची शिकवण देत तसे काम करायचे असते. याच्या उलटे झाले, तर सामाजिक संतुलन बिघडते,'' असे उद्गार ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आज काढले. "माझे श्रद्धास्थान असल्याने गहिनीनाथगडाचा विकास करीन,' असे आश्वासनही त्यांनी दिले.
नगर-बीड जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या गहिनीनाथगड (ता. पाटोदे) येथे संत वामनभाऊ महाराजांच्या जयंती सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंडे बोलत होत्या. या वेळी मठाधिपती विठ्ठल महाराज, खासदार प्रीतम मुंडे, आमदार जयदत्त क्षीरसागर आदी उपस्थित होते.
कोणाचाही नामोल्लेख न करता मुंडे म्हणाल्या, 'संतांनी अध्यात्माचे काम करायचे असते. आम्ही लोकांच्या इच्छेनुसार खुर्चीवर बसलो आहोत. आमच्याकडील (राजकीय) शस्त्र लोकांच्या संरक्षणासाठीच असते. निवड करताना चूक झाल्यावर त्याचे परिणाम दिसतात. पराभव झाला, तर पुन्हा जिंकायला सज्ज असावे लागते.''
'समाजाची सुरक्षा करण्याचा बाबांना दिलेला शब्द मी पाळते आहे. मी समाजाची आई असल्याचे म्हटले, तर काही लोकांनी नावे ठेवली; पण मातृत्व फक्त स्त्रीच करू शकते. लोक माझ्यासोबत असल्यामुळे वंचित- पीडित- दलितांचा आवाज होऊन मी सतत लढत राहणार आहे,'' असेही मुंडे म्हणाल्या.
सक्षम नेतृत्वाचा वारसा चालवतेय
पंकजा मुंडे म्हणाल्या, 'राजमाता जिजाऊ, अहल्यादेवी होळकर, झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, रमाबाई आंबेडकर यांनी भरीव काम करीत समाजाचे नेतृत्व केले. स्त्री वारसा होऊ शकते हे त्यांनी दाखवून दिलेले आहे. "समाजाला अंतर देऊ नको' असे बाबांनी सांगितले होते. त्यांना दिलेला शब्द मी पाळत आहे. बाबांच्या नावाला साजेलसे काम करीत मी सक्षमपणे नेतृत्व करीत आहे.'
|