पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु यांची तीन वर्षांची विशेष कामगिरी

prabhu
prabhu

अक्कलकोट (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्याचे  पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु यांच्या सेवेस नुकताच तीन वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला. यादरम्यान, २ हजार ३४२ विविध गुन्ह्यातील आरोपींवर कारवाई करून ४२ कोटी १४ लाख ८२ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यास त्यांना यश आले आहे.

कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत त्यांनी आपल्या सेवेतून वेळ काढून समाजासाठी वेगळे उपक्रम राबविल्यामुळे त्यांचा पोलीस प्रशासनात एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे. पोलीस अधिक्षकांनी सोलापूर जिल्ह्यात केलेली ही कारवाई  अवैध धंदेवाल्यांना सळो की पळो करून सोडल्यामुळे जिल्ह्यात अवैध धंद्याची कर्दनकाळ अशी त्यांची ओळख झाली आहे. पोलीस अधिक्षक वीरेश प्रभु यांनी २० मे २०१५ रोजी सोलापूर जिल्ह्याचा कार्यभार स्विकारला. ते मुळचे कर्नाटक येथील बेेल्लारी गावचे असून २००५ मध्ये आय.पी.एस.परीक्षा उत्तीर्ण होवून सेवेत रूजू झाले.

प्रथम त्यांनी गडचिरोली येथे नक्षली भागात कारवाया करून आपली छाप पाडली व तेथून एक कर्तव्यदक्ष अधिकारी अशी त्यांची राज्यात ओळख निर्माण झाली. सोलापूर जिल्ह्याचा कार्यभार स्विकारल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याचा चंग बांधला. अवैध धंद्यामुळे पैसा उपलब्ध होवून समाजात गुंडगिरी फोफावते, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यासाठी अवैध धंदे समुळ नष्ट केल्यास समाजात शांतता राखली जाईल या हेतूने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके,सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोसई गणेश निंबाळकर अशा अधिकाऱ्यांच्या टीम तयार करून  रात्रंदिवस या टीमने गनिमी कावा पद्धतीने विविध धंद्यावर धाडी टाकून अवैध व्यवसाय करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या.

कायदा, सुव्यवस्था अबाधित राखत पोलीस अधिक्षकांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या मालाला विक्रीसाठी व्यासपीठ तयार करून दिले. मुख्यालय परिसरात पेट्रोल पंप सुरू करून ग्राहकांची सोय केली. १०० टक्के शुध्दतेची येथे हमी असल्यामुळे पेट्रोल घेण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र आहे. याच परिसरात न्युट्रेशियन मॉल निर्मिती केंद्र सुरू केले. ग्रामीण भागातील अक्कलकोट (उत्तर), वळसंग, बार्शी, मोहोळ, मंद्रुप, मंगळवेढा येथील उपविभागीय पोलीस कार्यालय आदी ठिकाणी आय.एस.ओ. मानांकन करण्यात आले. पोलीस मुख्यालय येथे पोलीस कुटूंबाच्या स्वास्थ्यासाठी उद्यान उभारण्यात आले.

दहशतवाद, नक्षलवाद व वाहतूक नियमाची जनजागृती करण्यासाठी जिल्हाभरातून एल.ई.डी.स्क्रीन तयार करून वाहनाच्या माध्यमातून प्रसार करण्यात आला. ग्रामीण भागातील १५ पोलीस ठाण्याअंतर्गत महिला विश्रांतीगृह तसेच पंढरपूर ग्रामीण व बार्शी तालुका अशी दोन पोलीस ठाणे नव्याने कार्यरत करण्यात आली. पंढरपूर येथे पोलीस कल्याण योजनेअंतर्गत हॉली डे होमची निर्मिती व पोलीस संकुलनाची पुर्नरचना करण्यात आली. पोलीस व पोलीसांच्या मुलांना शारिरीक तंदुरूस्तीसाठी आधुनिक पध्दतीचा शारिरीक व्यायाम करता यावा यासाठी मुख्यालय येथे ओपन जीमची निर्मिती केली. ग्रामीण भागातील १८ पोलीस ठाण्यात फर्निचरसह अभ्यागत कक्ष सुरू करून पोलीस ठाण्याला आधुनिकता आणली. पोलीस अधिक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षाचे अद्यावत संगणकीकरण करण्यात आले.

नुकत्याच पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या. यामध्ये प्रत्येक कर्मचार्‍याच्या सोयीने पोलीस ठाणे मिळाल्यामुळे कर्मचारी वर्गात समाधान व्यक्त होत आहे. तीन आषाढी वारी, तीन कार्तिकी वारी, चैत्री, मार्गशिर्ष आदी १२ वार्‍या चांगल्या पध्दतीने बंदोबस्त ठेवून कुठलाही अनुचित प्रकार न घडता पार पाडल्या. जिल्ह्यातून २४५ लोकांना तडीपार करण्यात आले. यामध्ये मोक्काअंतर्गत ७४, मुंबई पोलीस कायदा कलम ५५, ५६,५७ प्रमाणे १६५ लोकांना तडीपार केले. तर ६ लोकांना स्थानबध्द केले. जिल्ह्यात विविध अवैध धंद्यावर झालेली कारवाई पुढीलप्रमाणे-

मटका-छापे (१४७ ठिकाणी छापे), कारवाई( ६४३ लोक), जप्त मुद्देमाल ( १ कोटी १४ लाख ९४ हजार ५९५ रू), दारू-छापे (२०४ ठिकाणी छापे), कारवाई (३८७ लोक), जप्त मुद्देमाल (१  कोटी ११ लाख ३५ हजार ९२१ रू),जुगार-छापे (९८  ठिकाणी छापे), कारवाई(१०३२ लोक), जप्त मुद्देमाल(३ कोटी ९ लाख ६० हजार ५७० रू),अवैध वाळूसाठा व वाहतूक-छापे (३८ ठिकाणी छापे), कारवाई(१५८ लोक), जप्त मुद्देमाल( १३४ कोटी ३० लाख ६९ हजार ८५० रू), गुटखा-छापे ( ५ ठिकाणी छापे), कारवाई( ८ लोक), जप्त मुद्देमाल( ९४  लाख ६१ हजार ८०० रू),चंदनतस्करी व गांजा-छापे ( ६ ठिकाणी छापे), कारवाई( १६ लोक), जप्त मुद्देमाल(८५  लाख ८३ हजार ४०० रू),पेट्रोल डिझेल चोरी-छापे (३ ठिकाणी छापे), कारवाई(११ लोक), जप्त मुद्देमाल(४० लाख ५६ हजार ९८१ रू), अवैध गॅस भरणा-छापे (४ ठिकाणी छापे), कारवाई(१४  लोक), जप्त मुद्देमाल(४ लाख २० हजार २०० रू), ज्वालाग्रही साठा-छापे (३ ठिकाणी छापे), कारवाई(६ लोक), जप्त मुद्देमाल( ९ लाख ८० हजार),वेश्या व्यवसाय-छापे (१२ ठिकाणी छापे), कारवाई(५५ लोक), ३५ पिडीत मुलींची सुटका केली,अफू-छापे (१  ठिकाणी छापे), कारवाई(१ लोक), जप्त मुद्देमाल( ४० हजार), मॅच बिटींग-छापे ( २ ठिकाणी छापे), कारवाई( ७ लोक), जप्त मुद्देमाल(१२ लाख ८९ हजार २००) असे एकूण तीन वर्षामध्ये ५२३ ठिकाणी छापे टाकून २ हजार ३४२ आरोपींना गजाआड करून ४२ कोटी १४ लाख ८२ हजार ५१७ रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सर्वाधिक मोठी कारवाई अवैध वाळू साठ्यावर झाली असून ३३ कोटी ३० लाख ५९ हजार ८५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधिक्षक यांच्या विशेष पथकातील पोलीस उपअधिक्षक संदीप मिटके, स.पो.नि.संदीप धांडे, स.पो.नि.प्रकाश वाघमारे, पो.स.ई.गणेश निंबाळकर, पो.हे.कॉ.अंकुश मोरे, मनोहर माने, पो.ना.अमृत खेडकर, मिलींद कांबळे, पो.कॉ.बाळराजे घाडगे, अभिजीत ठाणेकर, सुरेश लामजने, महादेव लोंढे, प्रविण पाटील, अमोल माने, नितीन चव्हाण, स्वप्निल गायकवाड, अमोल जाधव, पांडूरंग केंद्रे, अनुप दळवी, सचिन कांबळे, सागर ढोरे-पाटील, अक्षय दळवी, श्रीकांत जवळगे, श्रीकांत बुरजे, विलास पारधी, बालाजी नागरगोजे, गणेश शिंदे, सोमनाथ बोराडे, विष्णु बडे, सिध्दाराम स्वामी आदींनी रात्रीचा दिवस करून विविध ठिकाणी छापे टाकण्याचे काम केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com