प्रतापगड सुशोभीकरण, डागडुजी निधीअभावी बंद

Makrand-Patil
Makrand-Patil

महाबळेश्वर - प्रतापगड किल्ला सुशोभीकरण व डागडुजीचे काम शासन निधीअभावी बंद पडले आहे. २०१० मध्ये मंजूर आराखड्याला शासनाने अर्थसंकल्पात निधीची तरतूद न केल्यामुळे काम थांबवावे लागले. मात्र, रखडलेल्या कामाच्या तटबंदीचा दगड पडून नुकताच एका दुर्दैवी लहान पर्यटकाचा बळी गेला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गडावरील कामाबाबत व सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतापगड तटबंदी मजबुतीकरण व गडाच्या सुशोभीकरणासाठी २०१० मध्ये सुमारे १२ कोटी ९७ लाख रुपयांच्या विकास आराखड्याला तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी मंजुरी दिली होती. या आराखड्याचे काम चार टप्प्यांमध्ये करण्याचे प्रस्तावित होते.

मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्याचे काम २०१०-११ मध्ये पूर्ण करण्यात आले. त्यात मुख्य बुरुजाच्या भिंतीच्या काँक्रिटीकरणाला शिवप्रेमींचा विरोध होता. ही भिंत काळ्या दगडात करण्याची त्यांची मागणी होती. हे काम खर्चिक होत असल्याने हे काम थांबविण्यात आले होते. परंतु, तटबंदी बुरुजापासून जुन्या दरवाजापर्यंत दोन्ही बाजूने भिंतीचे मजबुतीकरण करण्यात आले होते. हे संपूर्ण काम सुमारे एक कोटी ३१ लाख २७ हजार ३९८ रुपयांचे होते. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जुन्या दरवाजापासून यशवंत बुरुज आणि मुख्य किल्ल्याची भिंत, यशवंत बुरुजापासून केदारेश्वर मंदिर बालेकिल्ल्याची भिंत व गोड्या पाण्याच्या तळ्याच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. हे कामदेखील गेल्या कालावधीपर्यंत सुरू होते. परंतु, नुकतेच शासनाच्या आवश्‍यक असलेल्या ९६ लाखांच्या निधीअभावी व या कामासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद न केल्याने हे काम यावर्षी थांबविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, दुर्दैवाने याच रखडलेल्या तटबंदीचा दगड माकडांच्या मस्तीमध्ये सुटून सांगली जिल्ह्यातील १३ वर्षांच्या मुलाच्या डोक्‍यात पडून त्याचा मृत्यू झाला. २०११-१२ मध्ये नियोजित असलेले काम अद्याप पूर्ण न झाल्याने चार टप्प्यांतील संपूर्ण काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न येथील नागरिक व शिवप्रेमींना पडला आहे.

पहिला टप्पा
पहिल्या टप्प्यात पुढील मुख्य बुरुजापासून जुन्या दरवाजापर्यंत संपूर्ण किल्ल्याच्या भिंतीची डागडुजी, मजबुतीकरण, बुरुज मजबुतीकरणाचे एक कोटी ३१ लाख सात हजार ३९८ रुपयांचे काम करणे प्रस्तावित होते. 

दुसरा टप्पा
दुसऱ्या टप्प्यात जुन्या दरवाजापासून ते यशवंत बुरुजाच्या मुख्य भिंतीचे मजबुतीकरण, यशवंत बुरुजापासून केदारेश्वर मंदिर बालेकिल्ला भिंत व गोड्या पाण्याच्या तळ्याच्या संरक्षणाचे सुमारे चार कोटी ३७ लाख ६२ हजार ५१६ रुपयांचे काम करणे प्रस्तावित होते.  

तिसरा टप्पा 
तिसऱ्या टप्प्यात केदारेश्वर मंदिर ते रेडका बुरुज ते यशवंत बुरुज व राहट टाकीचे संरक्षणाचे सुमारे तीन कोटी ५६ लाख ५४ हजार २५८ रुपयांचे काम करणे प्रस्तावित होते.  

चौथा टप्पा
चौथ्या टप्प्यात जुन्या दरवाजापासून भवानी बुरुज ते केदारेश्वर मंदिर, तसेच भवानी टाकीचे संरक्षण, मुख्य दरवाजा, जुना दरवाजा, बालेकिल्ल्याच्या दरवाजाचे व संपूर्ण आर्मर भिंतीचे मजबुतीचे सुमारे तीन कोटी ७२ लाख १९ हजार ३५१ रुपयांचे काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित होते. असे एकूण १२ कोटी ९७ लाख ६३ हजार ५२५ रुपयांच्या कामाचा आराखडा मंजूर केला होता. 

मी आमदार झाल्यानंतर तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व तत्कालीन पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून प्रतापगड किल्ल्याचा संपूर्ण विकास आराखडा मंजूर केला होता. एकूण १२ कोटी ९७ लाखांच्या कामाची तरतूद चार टप्प्यात पूर्ण करण्याचे ठरले होते. परंतु, आताच्या शासनाने मंजूर विकासकामासाठी अर्थसंकल्पात निधी मंजूर करण्याची तरतूद करणे अपेक्षित होते. परंतु, ते न केल्याने नाईलाजास्तव निधीअभावी हे काम बंद करण्यात आले, हे दुर्दैवी आहे.
- मकरंद पाटील, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com