Maratha Kranti Morcha : यापुढे मराठा आंदोलन रस्त्यावर नाही; समन्वयकांची घोषणा

Maratha Kranti Morcha
Maratha Kranti Morcha

पुणे : मराठा आरक्षण आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी यापुढे रस्त्यावर कोणतेही आंदोलन न करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा मोर्चाच्या वतीने घेण्यात आला आहे. रस्त्यावरच्या आंदोलनांमधून महाराष्ट्राचे होणारे अपरिमित नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे मोर्चाचे समन्वयकांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले. 

मोर्चाच्या वतीने गुरुवारी (9 ऑगस्ट) क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर झालेल्या प्रकाराने गालबोट लागले. त्यातून समाजाची बदनामी होत आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, विकास पासलकर, बाळासाहेब अमराळे आणि सचिन आडेकर यांनी ही माहिती दिली.

''पंधरा ऑगस्टपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत. त्या दिवशी आत्मक्‍लेष आंदोलन करण्यात येणार आहे. मराठ्यांच्या घरोघरी चूल बंद आंदोलन करण्यात येणार आहे. तसेच यापुढे रास्ता रोको, रेल रोको यासारखी समाजाला वेठीला धरणारी व सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलनाऐवजी जिल्हा-तालुका स्तरावर साखळी उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला'', अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. राज्य समन्वय समितीच्या बैठकीत हीच भूमिका मांडण्यात येणार आहे. 

मराठा क्रांती मोर्चाचा संबंध नाही
जिल्हाधिकारी कार्यालयासमोरचे काल झालेले ठिय्या आंदोलन राज्य समन्वय समितीच्या ठरवून दिलेल्या नियोजनाप्रमाणे शांततेत पार पडले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर राष्ट्रगीत झाले. त्यानंतर सर्वांना घरी परतण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र आंदोलनात घुसलेल्या बाह्य शक्तींनी यावेळी धुडगूस घातला. क्रांती मोर्चाने हिंसेचे कधीही समर्थन केलेले नाही. त्यामुळे हिंसक कारवाया करणाऱ्यांचे आम्ही समर्थन करणार नाही. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. कालचा जो प्रकार झाला, त्याच्याशी मराठा क्रांती मोर्चाचा कोणताही सबंध नाही. समन्वय म्हणून आम्ही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. 

चक्री आंदोलन सुरू करणार 
कुंजीर म्हणाले, "यापुढची आंदोलने आचारसंहितेचा फलक लावून केली जातील. आमच्या आंदोलनांमध्ये बाहेरच्या शक्ती घुसल्या तरी आमचे स्वयंसेवक त्यांना पकडून पोलिसांच्या हवाली करतील. आचारसंहितेनुसार चक्री उपोषणासह यापुढील सर्व आंदोलने शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने होतील. अन्य कोणत्याही व्यक्ती अथवा नेत्यांनी स्वतंत्रपणे आंदोलन करू नये. केल्यास त्यांचा आणि मराठा क्रांती मूक मोर्चाचा त्याच्याशी संबंध राहणार नाही. मराठ्यांची बदनामी होईल असे कोणतेही भडक संदेश सोशल मिडियातून पसरवू नयेत.यापुढे राज्य समन्वय समितीकडून जे सांगण्यात येईल, त्या नुसारच आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' 

नुकसान भरून देणार 
ठिय्या आंदोलनादरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले. ही घटना सकल मराठा समाजाला मान्य नाही. त्यामुळेच राज्यभरात योग्य संदेश देण्याच्या उद्देशातून या नुकसानीची भरपाई करून देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तोडफोड, हिंसा आम्हाला मान्य नाही. आरक्षण व सरकार दरबारीच्या इतर मागण्यांसाठी सनदशीर मार्गानेच आंदोलन झाले पाहिजे, असेही यावेळी समन्वयकांच्या वतीने सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com