राहुरी फॅक्टरी - उसाला 3400 रुपये टनाप्रमाणे भाव देण्याच्या मागणीसाठी वांबोरी येथील प्रसाद शुगर कारखान्याचा वजनकाटा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्त्यांनी शुक्रवारी बंद पाडला. त्यामुळे कारखान्याची गव्हाण चार तास बंद होती. योग्य भाव देण्याची ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
"स्वाभिमानी'चे तालुकाध्यक्ष रवींद्र मोरे म्हणाले, 'हंगाम सुरू होऊन 25 दिवस उलटले, तरी कारखान्याने भाव जाहीर केला नाही. राज्य सरकार व साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे कारस्थान चालविले आहे. उसाला 3400 रुपये टनाप्रमाणे भाव देण्यासाठी आम्ही जिल्हाभर आंदोलने करणार आहोत.''
तनपुरे म्हणाले, 'बाजारात साखरेचे दर तीन ते चार रुपयांनी घसरले आहेत. शेतकऱ्यांची मागणी रास्त आहे. मात्र, साखर 40 रुपये किलोने विकली जावी. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी विधानसभा व लोकसभेत आवाज उठविला पाहिजे. त्यांना जिल्ह्यात फिरू देऊ नका. या आंदोलनात मीही सहभागी होईल.'' या वेळी राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता.
|