मोदी सरकारविरोधात नकारात्मक वातावरण - राऊत

मोदी सरकारविरोधात नकारात्मक वातावरण - राऊत

गुहागर - पोटनिवडणुकांमुळे मोदी सरकारविरोधात नकारात्मक वातावरण देशात सुरू झाल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पूर्ण बहुमत मिळेल, अशी स्वप्ने पाहणाऱ्या भाजपच्या जागा येत्या निवडणुकीत कमी होतील. उत्तर प्रदेशातच या पक्षाला फार मोठे नुकसान सहन करावे लागेल. तरीही आगामी निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच सरकार स्थापन करेल, असे प्रतिपादन खासदार विनायक राऊत यांनी केले. 

ते म्हणाले की, केंद्राच्या कारभारावर आरएसएसचा प्रभाव आहे. मंत्रालयातील कामकाजातही त्यांचा हस्तक्षेप होतो. केंद्र सरकारचा कारभार योग्य रीतीने सुरू होता. देशासाठी अनेक चांगले निर्णय झाले. विकासकामांना गती मिळाली. तलाकबाबतच्या विधेयकाला मुस्लिम महिलांनी पाठिंबा दर्शविला. नोटाबंदीचे देशवासीयांनी समर्थन केले. मात्र, उत्तर भारतात गोरक्षकांनी घातलेला गोंधळ, काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना भारतीय सैनिक शहीद होण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे जनतेमध्ये केंद्र सरकारबाबत नकारात्मक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. केंद्राच्या कारभारावर आरएसएसचा प्रभाव आहे.

मंत्रालयातील कामकाजातही त्यांचा हस्तक्षेप होतो. या सर्व मुद्द्यांमुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला फटका बसू शकतो. उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा एकत्र आले, तर भाजपच्या उत्तर प्रदेशातील ५० जागा थेट कमी होऊ शकतात. त्यामुळे पुढील सरकार रालोआचे असेल, परंतु जागा कमी होतील.
सुषमा स्वराज्य आणि नितीन गडकरी यांची प्रशासनावर पकड आहे. पुढील लोकसभेत कदाचित हे दोन्ही मंत्री पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात.

स्वत:च्या खासदारकीबाबत राऊत म्हणाले की, मी स्वत: सिंधुदुर्गमधून लोकसभा लढविण्यास इच्छुक नव्हतो. विविध पर्यायांचा विचार पक्षाने केला. अखेर पक्षाचा आदेश म्हणून निर्णय मी स्वीकारला. गेल्या चार वर्षांत सातत्याने मतदारसंघात संपर्क ठेवला.

खासदार झाल्यानंतर १ वर्ष दिल्ली समजून घेण्यात गेले. आता दिल्लीत रुळलो. येथे कामे करून घेण्याची पद्धत समजली. अनेक कामांसाठी निधी दिला. आता माझ्या मतदारसंघात शिवसेनेचा कोणताही उमेदवार दीड ते पावणेदोन लाख मताधिक्‍याने निवडून येईल. राणेंचे दोन्ही सुपुत्र माझ्या, शिवसेनेच्या विरोधात जेवढे बोलतील तेवढाच माझा फायदा होईल. 

स्वतंत्र लढणार
भाजप आणि शिवसेनेमध्ये वैयक्तिक वाद नाहीत. केंद्रातील मंत्रिमंडळ सहकार्य करीत आहे. प्रत्येक पक्षाच्या काही भूमिका असतात, त्याप्रमाणे पक्षप्रमुख, प्रवक्ते वेळोवेळी बोलत असतात. पक्षवाढीसाठी शिवसेना पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांना स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी किंवा नंतर युती होणार का याचा निर्णय योग्यवेळी तेच घेतील, असे प्रतिपादन खासदार राऊत यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com