सदाभाऊ-कोरे भेटीने ‘स्वाभिमानी’त खदखद

सदाभाऊ-कोरे भेटीने ‘स्वाभिमानी’त खदखद

वारणानगर  - कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जिल्हा परिषदेच्या ऐन निवडणुकीच्या धामधुमीत वारणेत येऊन विनय कोरे यांची घेतलेली भेट ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांच्या मनाला वेदना देणारी ठरली असून, या भेटीपासून कार्यकर्त्यांत प्रचंड खदखद सुरू झाली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना झाल्यापासून ऊस दरावरून वारणा कारखान्याशी संघर्ष सुरू आहे. कारखाना सुरू करण्यापासून ते ऊस दर ठरविण्यापर्यंत ‘स्वाभिमानी’चे आणि ‘वारणा’चे कधीच पटले नाही. असे असताना माजी आमदार कोरे यांची भेट सदाभाऊ घेतातच कसे, असा सवाल कार्यकर्ते विचारू लागले आहेत. 

‘स्वाभिमानी’च्या प्रत्येक ऊस दर आंदोलनात वारणा समूहातील कार्यकर्ते व ‘स्वाभिमानी’चे सैनिक यांच्यात आजपर्यंत वाद झाले आहेत. काही गावांत हाणामारीचेही प्रसंग घडले आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीतही राजू शेट्टींसह सदाभाऊंनी विनय कोरेंचा समाचार घेऊन अन्य कारखान्यांपेक्षा ‘वारणा’ दरात कमी कसा, याचा लेखा-जोखा मांडून प्रचंड टीका केली होती. तसेच विनय कोरे यांनीही संधी मिळेल त्या वेळी शेट्टी व सदाभाऊंना लक्ष्य करीत वारणा कारखान्याच्या सभांतही स्वाभिमानी केवळ राजकारण करीत असल्याची टीका ते करायचे. यामुळे ‘स्वाभिमानी’ आणि ‘जनसुराज्य’च्या कार्यकर्त्यांत प्रचंड तणाव असायचा.  
गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत ‘स्वाभिमानी’ने भाजपशी संधान बांधले आणि त्यातून सदाभाऊंना मंत्रिपदही मिळाले. अलीकडे सदाभाऊ आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये हळूहळू दरी निर्माण व्हायला सुरवात झाली. त्यातच सदाभाऊंनी मुलगा सागर याला उमेदवारी दिल्याने खासदार शेट्टींना रुचलेले नाही. त्यांनी माध्यमांसमोर माझा घराणेशाहीला विरोध असल्याचे बोलूनही दाखविले आहे. त्यावर सदाभाऊंनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव उमेदवारी दिल्याचे सांगून यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे प्रकरण थांबण्यापलीकडे गेल्याने लोकांनाही चर्चेचा विषय बनला आहे.

जिल्हा परिषदेसाठी जनसुराज्यच्या विरोधात स्वाभिमानीचे उमेदवार असताना सदाभाऊंनी वारणेत जाऊन श्री. कोरेंची भेट घेतल्याने स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांत खदखद सुरू झाली आहे.

धृतराष्ट्रानंतर पुत्र प्रेमासाठी आंधळा झालेला पहिलाच माणूस पाहिला. ज्या कारखानदारांच्या विरोधात झगडण्यासाठी आयुष्य घालविले, त्या कारखानदारांच्या दारात केवळ ‘मता’साठी जोगवा मागायला जाणे हे चळवळीत बसत नाही. त्यामुळे जनतेत असंतोष असून, कार्यकर्तेही नाराज आहेत.  
- शिवाजी माने, जिल्हा नियोजनचे सदस्य

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com