भाजपला मते देवून सांगली जिल्ह्याचा विकास खुंटला: अजित पवार

Ajit Pawar
Ajit Pawar

सांगली - केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. गेल्या तीन वर्षात भाजपला ताकद देण्याचे काम मतदारांनी केले. मात्र त्याबदल्यात जिल्ह्याला काय मिळाले? युतीचे पाच आमदार असतानाही जिल्ह्याचा विकास खुंटला. इथल्या रस्त्याची, स्वच्छतेची काय अवस्था झाली आहे? कुणी वाली आहे का जिल्ह्याला? जिल्ह्याकडे सरकारचे पुर्ण दुर्लक्ष केले आहे. याचा पश्‍चाताप मतदारांना होत आहे अशा शब्दात आज राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री आमदार अजित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला. 

सांगलीत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने पक्षाचा मेळावा घेण्यात आला. डेक्कन मॅन्युफॅक्‍चरर्स असोसिएशनच्या सभागृहात झालेल्या या मेळाव्यात अजित पवार यांनी सरकारच्या धोरणांमुळे देशात आणि राज्यात गुंडगिरी वाढल्याचा आरोप केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार सुमन पाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, जिल्ह्याच्या निरीक्षक राजलक्ष्मी भोसले, युवती प्रदेशाध्यक्षा स्मिता पाटील, सामाजिक न्याय सेलचे प्रदेशाध्यक्ष जयदेव गायकवाड आदी उपस्थित होते. 

पवार म्हणाले, "इथल्या सामान्य माणसाची अवस्था काय झाली आहे याचा विचार राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावा. राष्ट्रवादी एक कुटुंब आहे. भांड्याला भांडे लागले तर आवाज किती करायचा याचे भान ठेवा. पक्षाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्या. पक्षाची बदनामी म्हणजे पवारसाहेबांची बदनामी होते लक्षात ठेवा.'' 

ते म्हणाले, "कोपर्डी प्रकरणातील आरोपीला वर्ष झाले तरी फाशी होत नाही. उत्तर प्रदेशात गोवंश हत्या बंदी कायद्यातून मुस्लीमांची घरे पेटवली जातात. सरकारच्या धोरणांमुळे गुंडगिरी वाढली.धर्माच्या नावाखाली गुंडगिरी वाढतान दिसते. असे मागे कधी होत नव्हते. गुंडगिरी रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे.'' अशा शब्दात त्यांनी सरकारवर टीका केली. 

संघर्ष यात्रेमुळे शेतकरी पेटून उठला आणि संप केला. त्यामुळे सरकार जागे झाले आणि कर्जमाफी केली. मात्र आजही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाहीत. कसली कर्जमाफी, कशाला फसवणूक करता? नोटबंदीनंतर जिल्हा बॅंकांमध्ये शेकडो कोटी रुपये बिन व्याजी पडून आहेत. यामुळे बॅंका बंद पडतील, व्यवहार बंद पडतील आणि खासगी सावकारी वाढेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. शेतीचा आणि यांचा कुठे तरी संबंध आहे का? शेतकरी आडवा व्हायची वेळ आली आणि हे योगा करत बसलेत अशा शब्दात सरकारच्या कर्जमाफी धोरणाचा समाचार घेतला.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com