सांगली - शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर आज विश्रामबाग चौकात जेलभरो आंदोलन करणारे कार्यकर्ते आणि पोलिसांविरोधात निषेध मोर्चा काढणारे वकील अशा दोनशेहून अधिक जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केले. दरम्यान, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू देणार नाही.
कोणीही असले तरी कर्तव्य व जबाबदारी शांत, संयमाने आणि पूर्ण ताकदीने पार पाडू, असा इशाराच पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिला. शिंदे म्हणाले, 'विश्रामबाग पोलिस ठाणे आवारात काल जमावबंदी आणि पोलिस कायदा कलम 69 नुसार आंदोलकांना तात्पुरता अटकाव केला होता. आंदोलकांकडून जोपर्यंत परिस्थिती बिघडवू शकते असे वाटले तोपर्यंत त्यांना अटकाव करण्याचा अधिकार पोलिसांना होता. सांगलीत परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्यांना तासगावला नेले. तेव्हा आंदोलकांनी उद्धट वर्तन करून गाडीत बसण्यास नकार दिला. कोणीही कोणत्याही प्रकारे गैरवापर करून कायदेशीर कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करू नये.''
|