शिरगाव पहिले डिजिटल गाव

शिरगाव पहिले डिजिटल गाव

सांगली - केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग म्हणून दोन महिन्यांत जिल्ह्यातील ६९९ ग्रामपंचायती उच्च वेगाच्या इंटरनेट जोडणीने थेट दिल्लीशी जोडल्या जात आहेत. यातील पहिल्या टप्प्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले, आज तासगाव तालुक्‍यातील शिरगाव जिल्ह्यातील पहिले आणि पश्‍चिम महाराष्ट्रातील पहिले डिजिटल गाव ठरले. या गावची ग्रामपंचायत आता ऑप्टिकल फायबर केबलने पंचायत समितीशी जोडली गेली.  

डिजिटल इंडिया या कार्यक्रमांतर्गत केंद्र सरकारने देशातील अडीच लाख गावे उच्च वेगाच्या इंटरनेट कक्षेत आणण्याचा निर्धार केला. केंद्र सरकारच्या कॅशलेस व्यवहारापासून अनेक योजनांचा पायाच मुळी या क्षमतेची इंटरनेट सुविधा आहे. त्यासाठी केंद्र सरकारने भारत ब्रॉडबॅंड नेटवर्क लिमिटेड (बीबीएनएल) कंपनी स्थापन केली. देशभरात या योजने अंतर्गत केबल टाकण्याचे काम सुरू आहे. सांगली जिल्ह्यात ७०५ ग्रामपंचायती आहेत. त्यांपैकी ५३४  ग्रामपंचायती पहिल्या टप्प्यात या ऑप्टिकल केबलने थेट जोडल्या जातील. जिल्ह्यातील कडेगाव आणि जत हे दोन तालुके दुसऱ्या टप्प्यात आहेत. त्यांचे काम पावसाळ्यानंतर सुरू होईल. 

आज या योजनेअंतर्गत शिरगाव जिल्ह्यातील पहिले डिजिटल गाव ठरले. गेल्या मार्चपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. केबलसाठी खोदाई आणि ती टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे; मात्र त्यासाठीची आवश्‍यक यंत्रसामग्रीला विलंब झाला. गेल्या आठवड्यात ती मिळताच आठवडाभरात पहिले गाव डिजिटल करण्याच्या दिशेने पाऊल टाकले. उर्वरित गावेही लवकरच जोडली जातील असे या योजनेत जिल्ह्याची जबाबदारी पाहणारे विभागीय अभियंता व्ही. एम. पाटील यांनी सांगितले. आज शिरगाव येथे समारंभपूर्वक केबल कार्यान्वित झाले. तासगाव पंचायत समिती ते शिरगाव ग्रामपंचायत अशी थेट स्वतंत्र केबलद्वारे इंटरनेट जोडणीची चाचणी झाली.

डिजिटल इंडियामुळे काय होईल?
इंटरनेटला वेग नाही, ही समस्याच यापुढे कालबाह्य होईल. प्रत्येक गावात किमान १०० एमबी वेगाने इंटरनेट सेवा उपलब्ध होईल. त्यामुळे अनेक गावे वायफाय होऊ शकतात. तेथील सर्व शासकीय कार्यालये-बॅंकांना हव्या त्या वेगाची इंटरनेट सुविधा मिळेल. प्रत्येक ग्रामपंचायतीस उच्च वेगाने इंटरनेट सुविधा घेण्यासाठी विशेष अनुदान मिळणार आहे. ग्रामंपचायत-पंचायत समिती-जिल्हाधिकारी कार्यालय-जिल्हा परिषद-मंत्रालय आणि केंद्र सरकार अशी सर्व शासकीय कार्यालये उच्च वेगाच्या इंटरनेट सुविधेने जोडली जातील. 

डिजिटल होणारी तालुकानिहाय गावांची संख्या अशी ः तासगाव-६८, कवठेमहांकाळ-६०, मिरज-६४, शिराळा-९२, वाळवा-९५, आटपाडी-५६, खानापूर-६५, पलूस-३४, दुसऱ्या टप्प्यात जतमधील ११२ तर कडेगावमधील ६२ गावे डिजिटल होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com