"जलयुक्त' चे 12 कोटी खर्च करण्याची घाई

"जलयुक्त' चे 12 कोटी खर्च करण्याची घाई

सांगली - जलयुक्त शिवार अभियानात गेल्या तीन वर्षात निवडलेल्या गावातील कामे पूर्ण करण्यासाठी आणि पूर्ण कामासाठी जिल्ह्याला 11 कोटी रूपये मंजूर केले आहेत. तर गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारसाठी एक कोटी 70 लाख रूपये असा एकूण 12 कोटी 70 लाख रूपये निधी मंजूर केला आहे. मार्चअखेरीस हा निधी खर्च करण्याचे निर्देश जलसंधारण विभागाने दिले असल्यामुळे जिल्हा प्रशासनाची गडबड उडाली आहे. 

जलयुक्त 2016-17 मध्ये जिल्ह्यातील 140 गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड केली होती. जिल्हा परिषदेतील छोटे पाटबंधारे विभागामार्फत 284 कामांना प्रशासकीय मान्यता दिली. त्यासाठी 19 कोटी 36 लाख रूपये निधी मंजूर होता. आजअखेर 268 कामे पूर्ण असून 10 कामे प्रगतीपथावर व सहा कामे रद्द प्रस्तावित आहेत. 12 कोटी 58 लाख रूपये खर्च झाले आहेत. मार्चअखेर 10 कामे पूर्ण करण्याचे आव्हान आहे. 2017-18 मध्ये 140 गावांची निवड केली. या गावातील 243 कामासाठी 17 कोटी 65 लाख रूपयाचा आराखडा केला आहे.

243 कामांना तांत्रिक मान्यता व त्यापैकी 241 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. 243 कामासाठी अंदाजपत्रकीय किंमत 16 कोटी 49 लाख इतकी आहे. मान्यता मिळालेल्या 241 पैकी 133 कामे लोकसहभागातून ग्रामपंचायतीमार्फत पूर्ण करायची आहेत. सद्यस्थितीत 50 कामे सुरू होऊन सहा पूर्ण झाली आहेत. तर 44 कामे प्रगतीपथावर आहेत. 58 कामांची निविदा प्रक्रिया सुरू आहे. 

जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जलयुक्त शिवार अभियानाची 2015-16 ची शिल्लक 16 कामे व 2017-18 मधील नवीन 14 अशा 30 कामासाठी चार कोटी 31 लाख रूपयाच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गतवर्षी मार्चअखेर अपूर्ण असलेले आठ पाझर तलाव, 27 सिमेंट बंधारे पूर्ण करण्यात आलेत. 2016-17 मधील शिल्लक तीन कोटी व 207-18 मधील प्राप्त तीन कोटी 30 लाख रूपयापैकी तीन कोटी 52 लाख रूपये खर्च झाले आहेत. उर्वरीत दोन कोटी 77 लाख रूपये मार्चअखेर पूर्ण करण्याचे आव्हान आहे. 

जलयुक्तच्या कामात समावेश असलेल्या नविन कोल्हापूर पद्धतीचे पाच बंधाऱ्याच्या तीन कोटी रूपयाच्या कामास 2017-18 मध्ये प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. गतवर्षीच्या अपूर्ण सात बंधाऱ्यापैकी चार बंधारे पूर्ण केले आहेत. गतवर्षी प्राप्त झालेले दोन कोटी 25 लाख रूपये देखील मार्चअखेर पूर्ण करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे. 

जलसंधारण विभागाने गेल्या तीन वर्षात निवडलेल्या गावातील पूर्ण कामे आणि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी 11 कोटी रूपये आणि गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवारसाठी एक कोटी 70 लाख रूपये वितरीत केले आहे. मार्चअखेर निधी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे निधी खर्च करण्यासाठी गडबड उडाली आहे. 

जिल्हाधिकारी यांचे खडेबोल 
जलयुक्त शिवार अभियानातील अनेक कामे कासवगतीने सुरू असल्याबद्दल जिल्हाधिकारी विजयकुमार काळम यांनी नुकतेच बैठकीत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. त्यामुळे मार्चअखेर कामे मार्गी लावून निधी अखर्चित राहणार नाही यासाठी अधिकाऱ्यांची पळापळ सुरू झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com